भगवंताचे नाम कधी सोडू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:28 IST2021-03-08T04:28:47+5:302021-03-08T04:28:47+5:30

संत हे भगवंताशी एकरूपच झालेले असतात. भगवंताचे नाम घेणे म्हणजे आपल्या कर्तेपणाचा अभिमान कमी करणे होय. नामाचे प्रेम लागले ...

God's name should never be left out | भगवंताचे नाम कधी सोडू नये

भगवंताचे नाम कधी सोडू नये

संत हे भगवंताशी एकरूपच झालेले असतात. भगवंताचे नाम घेणे म्हणजे आपल्या कर्तेपणाचा अभिमान कमी करणे होय. नामाचे प्रेम लागले म्हणजे कर्तेपणाचा अभिमान कमी होतो. कर्तेपणा भगवंताकडे सोपविल्यावर आपली स्वतःची इच्छा राहातच नाही. जिथे इच्छा नाही तिथे यशापयशाचे महत्त्व उरत नाही. कधी सुख तर कधी दुःख, कधी यश तर कधी अपयश, हा प्रपंचाचा धर्मच आहे हे ओळखून आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटना ‘त्याच्या’ इच्छेने आणि सत्तेने घडून येतात, अशी जाणीव ज्याच्या अंतःकरणात उमटली त्याला भगवंताचे अस्तित्व खरे समजले. ‘मी खरा नसून तोच खरा आहे’ हे सांगण्यासाठी जिथे ‘मी’च उरत नाही, ती खरी पूर्णावस्था होय. तिथे ‘मी त्याला जाणतो’ हेदेखील संभवत नाही.

संत ओळखू यायला आणि त्याची भेट घडायला, भगवंताचे नामच घेत राहणे आवश्यक आहे. नाम घेत असताना सदाचरण कधी सोडू नये, नीतीच्या मर्यादा कधी ओलांडू नयेत, निराश कधी बनू नये, देहाला उगीच कष्टवू नये, पण काही झाले तरी भगवंताचे नाम कधी सोडू नये. कर्तव्याचे फळ प्रारब्धाधीन असल्याने जे फळ मिळेल, त्यात समाधान मानावे. किंबहुना भगवंताच्या सत्तेने सर्व सूत्रे हलतात म्हणून प्रारब्धदेखील त्याच्या नजरेखाली काम करते.

नाम घेणे म्हणजे सर्वस्व देणेच होय. मोठा अधिकारी आपल्या सहीचा शिक्का करतो. तो ज्याच्या हातामध्ये असतो तो मनुष्य त्या शिक्क्याने साहेबाइतकेच काम करवून घेऊ शकतो. हे जसे व्यवहारामध्ये आहे अगदी तसेच भगवंताच्या बाबतीतही आहे. जे काम प्रत्यक्ष भगवंत करतो तेच काम त्याचे नाम करीत असते. भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की, त्याच्याआड दुसरे काही येत नाही.

Web Title: God's name should never be left out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.