घरपोच मिळतोय पोषण आहार, शाळेत शिजवलेला आहार नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:58 IST2021-02-06T04:58:27+5:302021-02-06T04:58:27+5:30
नंदुरबार : शाळा बंद झाल्यापासून विद्यार्थ्यांना घरीच पोषण आहाराचे वाटप केले जात आहे. लॅाकडाऊनच्या काळातदेखील शिक्षकांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ...

घरपोच मिळतोय पोषण आहार, शाळेत शिजवलेला आहार नाहीच
नंदुरबार : शाळा बंद झाल्यापासून विद्यार्थ्यांना घरीच पोषण आहाराचे वाटप केले जात आहे. लॅाकडाऊनच्या काळातदेखील शिक्षकांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना घरपोच पोषण आहार वाटप केला. आता देखील शाळा सुरू झाल्या असल्या तरी शाळेत शिजवलेला पोषण आहार वाटप न करता विद्यार्थ्यांना घरीच तांदूळ, दाळ व कडधान्य दिले जात आहे. दरम्यान, दुर्गम भागातील शाळांमध्ये नियमित वाटप होत नसल्याच्या तक्रारी काही शाळांबाबत झाल्या आहेत.
जिल्ह्यात जवळपास १८०० पेक्षा अधिक प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार वाटप केला जातो. कोरोनाच्या आधी शाळांमध्ये शिजवलेला पोषण आहार दिला जात होता. परंतु लॅाकडाऊन आणि कोरोनानंतर शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांना तांदूळ, दाळ व कडधान्याच्या स्वरूपात पोषण आहार घरीच वाटप केला जातो.
फक्त तांदूळच नव्हे दाळ व कडधान्यही...
n जिल्ह्यात शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना तांदूळच नव्हे तर दाळ व एक कडधान्य त्यांच्या उपस्थितीच्या सरासरीनुसार वाटप केले जात आहे. काही भागात केवळ तांदूळच दिला जात असल्याच्या तक्रारी होत्या. विशेषत: दुर्गम भागातील शाळांमध्ये नियमित वाटप होत नसल्याच्या तक्रारी होत्या, परंतु त्या तक्रारींमध्ये चौकशीअंती तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले.
विद्यार्थी संख्येच्या सरासरीने वाटप...
जिल्हा केंद्रातून त्या त्या शाळांना विद्यार्थी संख्येनुसार पोषण आहार पुरविला जातो. शाळांमध्ये मिळालेले धान्य, कडधान्य व डाळ सरासरीनुसार वाटप होते.
यासाठी ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना बोलावून किंवा घरपोच वाटप करावा लागतो. तर शहरी भागात पालकांच्या मोबाइलवर मेेसेज टाकून घेण्यासाठी बोलवतात.
आता शाळा सुरू झाल्या तरी कोरोनाच्या प्रादुर्भाव लक्षात घेता शिजवलेला आहार न देण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे अद्यापही शाळांमध्ये शिजवलेला आहार दिला जात नाही.
आहार शिजविण्यासाठी लागणारे इंधन, स्वयंपाकी मदतनीस यांचे मानधन यासह मसाले व इतर वस्तूंचा खर्च वाचत आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपयांची बचत होत आहे. शिवाय मिळणारा शिधा हा कुटुंबालादेखील लाभदायी ठरत असल्याचे चित्र आहे.
शाळांना विद्यार्थी संख्येनुसार मिळणारा पोषण आहार व विद्यार्थ्यांना दर महिन्याला वाटप केला जात आहे. लॅाकडाऊनमध्येही तो वाटप केला गेला होता. त्यामुळे अनेक संकट काळात कुटुंबांना आधार मिळाला होता.
-जि.प. शाळा शिक्षक.