तालुक्यातील ग्रामीण भागात कुठलाही उद्योगधंदा नाही परिणामी अनेक महिला या शेतमजूर म्हणून काम करतात व मोलमजुरी करून आपल्या कुटुंबीयांचा चरितार्थ चालवतात. वर्षभरात विविध कारणांमुळे कामधंदे बंद पडले, मजुरी मिळेनाशी झाली. यामुळे अगोदरच कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा परिस्थितीत गॅसची दरवाढ झाली त्यामुळे नवीन गॅस सिलिंडर घेण्यासाठी पैसे कोठून आणावेत , असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे . गॅस सिलिंडर मिळाल्याने रॉकेलही बंद झाले आहे . त्यामुळे उज्ज्वला गॅस योजनेने रॉकेल हिरावले , तर महागाईने गॅस हिरावला , असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे . गॅस व रॉकेल अभावी अनेक घरांत चुली पेटू लागल्या असल्याने ग्रामीण भागात पुन्हा सरपण म्हणून लाकडाचा वापर वाढला आहे. केंद्र शासनाने किमान उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या कुटुंबीयांना गॅस सिलिंडर घेण्यासाठी सबसिडी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.
गॅस दरवाढीने सामान्यांचे अर्थकारण विस्कटले, उज्ज्वला योजनेचे गॅस शोभेपुरतेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:30 IST