अज्ञानाचा अंधार दूर करणारी तरुणांची ‘टोळी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 12:33 IST2019-12-22T12:33:45+5:302019-12-22T12:33:50+5:30

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आपण ज्या परिसरातून आलो त्या परिसरातील लोकांसाठी काही तरी करावे या ...

The 'gang' of young people who remove the darkness of ignorance! | अज्ञानाचा अंधार दूर करणारी तरुणांची ‘टोळी’!

अज्ञानाचा अंधार दूर करणारी तरुणांची ‘टोळी’!

रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आपण ज्या परिसरातून आलो त्या परिसरातील लोकांसाठी काही तरी करावे या उद्देशाने एकत्र आलेल्या पुण्यातील खान्देशी तरुणांनी जिल्ह्यातील तब्बल २०० पेक्षा अधिक शाळांमध्ये वाचनालये सुरू केली आहेत. आपल्या उत्पन्नातील काही रक्कम या सेवा कार्यासाठी देऊन सुरू झालेला सेवेचा हा यज्ञ अखंड तेवत ठेवण्यासाठी या तरुणांची धडपड सुरू आहे.
चार वर्षापूर्वी पुण्यात नोकरीनिमित्ताने कार्यरत असलेल्या कोठली, ता.शहादा येथील प्रवीण सुरेश महाजन या तरुणाला आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी काही केले पाहिजे ही कल्पना सूचली. डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनीच त्यांनी जिल्ह्यातीलच काही ठराविक तरुणांना एकत्र करून त्याची कल्पना दिली आणि त्यातूनच ‘युवक मित्र परिवारा’ची स्थापना झाली. नंदुरबार जिल्हा हा विशेषत: राज्यातील सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा असल्याने या भागातील विनाअनुदानित व आदिवासी भागातील शाळांना पुस्तकाचे दान देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी आपल्या उत्पन्नातील एक टक्का रक्कम दर महिन्याला गोळा करावी आणि त्यातून हे सेवा कार्य सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पाहता पाहता या युवक मित्र परिवारात नंदुरबार जिल्ह्यातीलच नव्हे तर खान्देशातील ५० पेक्षा अधिक मित्र सहभागी झाले. हा मित्र परिवार आदिवासी भागातील शाळेला २०० पुस्तके भेट देऊन तेथे वाचनालय सुरू करतात. आतापर्यंत नंदुरबार जिल्ह्यातील २०० पेक्षा अधिक शाळा तसेच जळगाव जिल्ह्यातील आठ शाळांमध्ये असे वाचनालय सुरू झाले आहेत.
याशिवाय जुने संगणकांची खरेदी करून तेदेखील आवश्यक असलेल्या शाळांना ते पुरवतात. या योजनेत ९८ शाळांना त्यांनी विनामूल्य संगणक पुरविले आहेत. त्यांच्या या कार्याला योगदान देण्यासाठी पुण्यातच सवलतीच्या दरात पुस्तके आणि संगणक देणारे विक्रेतेही पुढे आले आहेत.
आता संगणकाबरोबरच आवश्यक त्या शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तरे व इतर शालेय वस्तूही हे युवक मोफत उपलब्ध करून देत आहेत. गेल्या चार वर्षापासून सुरू असलेली ही सामाजिक चळवळ अखंडपणे सुरू असून त्याला भविष्यातही खंड न पडण्याबाबत हे युवक काळजी घेत आहेत.

साक्षरतेच्या बाबतीत सर्वात शेवट असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात वाचन चळवळ वृद्धींगत व्हावी व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लागावा या उद्देशाने आम्ही मित्र परिवार एकत्र आलो आहोत. आमच्या कार्याला हातभार लावण्यासाठी अनेक दाते पुढे येत असतात. शिवाय मित्र परिवारातर्फे उत्पन्नातील एक टक्का रक्कम दर महिन्याच्या पहिल्या रविवारी एकत्र केली जाते. त्यातूनच हे कार्य सुरू असून त्यात खरोखरच आनंद मिळतो.
-प्रवीण महाजन, कोठली, ता.शहादा.

Web Title: The 'gang' of young people who remove the darkness of ignorance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.