जिल्ह्यात मुलभूत सुविधांसाठी ‘ड्रीम प्रोजेक्ट’ राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 12:30 IST2020-02-08T12:30:01+5:302020-02-08T12:30:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : समाजकारण करण्याचे ध्येय मनात बाळगले असतांना अचानक राजकारणात यावे लागले. त्यामुळे मिळालेल्या संधीचे सोने ...

जिल्ह्यात मुलभूत सुविधांसाठी ‘ड्रीम प्रोजेक्ट’ राबविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : समाजकारण करण्याचे ध्येय मनात बाळगले असतांना अचानक राजकारणात यावे लागले. त्यामुळे मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्यातील मुलभूत प्रश्नांसदर्भात आपला ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असून पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री, खासदार व सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने तो तडीस नेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड.सिमा पद्माकर वळवी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
नवनियुक्त जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड.सिमा वळवी यांनी शुक्रवार, ७ रोजी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’तर्फे त्यांचे स्वागत कार्यालय प्रमुख रमाकांत पाटील व मनोज शेलार यांनी केले. यावेळी अॅड.वळवी यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम आणि संकल्पाविषयी माहिती दिली.
समाजकारणातून राजकारणात
कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर समाजकारण किंवा कायद्याची प्रॅक्टीस करण्याचा आपला विचार होता. परंतु जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी तळोदा तालुक्यातील कार्यकर्त्यानी आपल्या उमेदवारीसाठी वडिल अॅड.पद्माकर वळवी यांच्याकडे आग्रह धरला. वडिलांनीही कार्यकर्त्यांच्या आग्रहाचा मान ठेवत माझी उमेदवारी जाहीर केली. आपल्यासाठी हा धक्का होता. परंतु लहानपणापासून घरातील राजकारणाचे बाळकडू मिळाल्याने आपण लागलीच मनाची तयारी केली. निवडणुकीत भरघोस मतांनी निवडूनही आलो. अध्यक्षपदाचा विचार व अपेक्षाही नसतांना हे पदही मिळाले. समाजकारणाचा विचार करतांना अचानक राजकारणात यावे लागले आणि एवढ्या मोठ्या पदाची जबाबदारी घ्यावी लागली हे आपल्या दृष्टीने अनाकलनीय होते. परंतु लागलीच आपण मानसिकता केली आणि या पदाला पुरेपूर न्याय देण्याचे ठरविले.
ड्रीम प्रोजेक्ट...
जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण, पाणी व स्वच्छता या मुलभूत प्रश्नांना आपले प्राधान्य राहणार आहे. स्थलांतर रोखले जावे, स्थानिक ठिकाणी मजुरांना काम मिळावे यासाठी काय करता येईल यावर अभ्यास सुरू आहे. सुदैवाने आपल्या जिल्ह्याला आदिवासी विकास मंत्रीपद मिळाले आहे.
मंत्री अॅड.के.सी.पाडवी यांच्या माध्यमातून विविध योजना राबविण्याचा प्रयत्न राहणार आहे. खासदार डॉ.हिना गावीत यांच्या माध्यमातून केंद्राच्या योजना आणून राज्य व केंद्राच्या योजनेची सांगड घालत हा ड्रीम प्रोजेक्ट साकारला जाणार असल्याचे अॅड.सिमा वळवी यांनी सांगितले.
जि.प.मध्ये येणाºया प्रत्येकाचे काम झाले पाहिजे.
४खरं तर राजकारणाबाबत जे सर्वसामान्य तरुण विचार करतात तेच माझेही मत होते... ‘पॉलीटिक्स इज डर्टी’ पण ही डर्टी कोणाला तरी क्लिन करावीच लागणार आहे. त्यामुळे मिळालेल्या संधीचा का आपण सकारात्मक दृष्ट्या विचार करू नये हीच भावना मनात घेवून राजकारणात आपण आलो आहोत. आपल्या परीने प्रामाणिकपणे काम करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सर्वच प्रश्न, सर्वच समस्या आपण सोडवू शकत नाही याची आपल्याला जाणीव आहे. पण जे करणार ते बेस्ट करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. मला माहिती आहे, जिल्हा परिषद अध्यक्षांचा कामाच्या देखील मर्यादा असतात. पण या मर्यादापलीकडे जिल्ह्यातील सार्वजनिक प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी सर्व ज्येष्ठ, जाणकार, अधिकारी, कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक यांच्याकडून जे जे मिळेल ते मार्गदर्शन आपण घेवून काम करणार आहोत. माझ्या कारकिर्दीत निश्चितच बदल झाल्याचे आपल्याला दिसून येईल, त्यासाठी मला सर्वांचे सहकार्य व आशिर्वादाची गरज असल्याचे अॅड.सिमा वळवी यांनी सांगितले.
शाळा, आरोग्य केंद्र, अंगणवाडी व शासकीय कार्यालयांना पदाधिकारी, अधिकारी यांनी अचानक भेटी दिल्यावर कुणी गैरहजर राहिल्यास त्यांचा त्या दिवसाचा पगार कापण्याची शिक्षा दिली जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळा तसेच अंगणवाडींना इमारती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी ठोस असा कार्यक्रम राबविला जाईल.
जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या तालुका व जिल्हास्तरावर क्रिडा स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. शिवाय विज्ञान प्रदर्शनासाठी निधी वाढविण्यात येणार आहे.
महिला आणि बालकांच्या विकासासाठी गाव पातळीवर योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी महिला व बालकल्याण विभाग आणि डीआरडीए यांना अधीक प्रोत्साहित केले जाणार आहे.
सरदार सरोवर प्रकल्पबाधितांचे प्रश्न अद्याप कायम आहेत. ते सोडविण्यासाठी आपण लवकरच बैठक घेणार.
जिल्हा परिषद चालवितांना सर्व पक्ष, गट आणि घटकांचे सहकार्य घेतले जाणार.