अक्कलकुवा शहरातील चार ट्रान्सफाॅर्मर्स बंद पडल्याने दाटला अंधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:31 IST2021-05-08T04:31:46+5:302021-05-08T04:31:46+5:30
शहरातील इंदिरानगर भागातील डॉ. बंगाली यांच्या घरासमोर, कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ, अस्लम हॉस्पिटलचे, तसेच बर्फ कारखाना परिसरात एक, असे ...

अक्कलकुवा शहरातील चार ट्रान्सफाॅर्मर्स बंद पडल्याने दाटला अंधार
शहरातील इंदिरानगर भागातील डॉ. बंगाली यांच्या घरासमोर, कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ, अस्लम हॉस्पिटलचे, तसेच बर्फ कारखाना परिसरात एक, असे चार ट्रान्सफाॅर्मर्स बंद पडले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून हे रोहित्र बंद आहे. लाॅकडाऊनमुळे नागरिक घरीच आहेत. यातून तापमानाचा पारा चाळिशी पार गेला आहे. परिणामी विजेअभावी पंखे व कूलर बंद पडत असल्याने नागरिक उकाड्याने हैराण होत आहेत. रात्रीच्या वेळी परिसरात डास आणि उकाडा यामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. अक्कलकुवा शहरात वीज कंपनीचा कारभार अत्यंत ढिला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एखादा ट्रान्सफाॅर्मर नादुरुस्त झाल्यास त्याची १० दिवसांपर्यंत दुरुस्ती करण्यात येत नसल्याची माहिती आहे. शहरात एखादा ट्रान्सफाॅर्मर्स नादुरुस्त झाल्यास इतरांवर लोड पडून तेही नादुरुस्त होत असल्याचे प्रकार होऊनही संबंधितांकडून दुर्लक्ष होत असल्याची माहिती असूनही कंपनीकडून दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सध्या सीतानगर, इंदिरानगर, बच्चूभाई कॉलनी आदी परिसरात नर्मदा कॉलनीच्या ट्रान्सफाॅर्मरवरून वीज पुरवठा होत आहे; परंतु या लाइनवरही वीज चोरटे आकडे टाकत असल्याने वारंवार फ्यूज उडत आहे. शहरातील सर्व ट्रान्सफाॅर्मर्स १०० किलो व्हॅट क्षमतेची आहेत. त्यामुळे ते नादुरुस्त झाल्यास त्या जागी दुसरे रोहित्र त्वरित मिळत नाही. सध्या अक्कलकुवा येथे एकही रोहित्र शिल्लक नसल्याने शहादा येथील वरिष्ठ कार्यालयातून रोहित्रांची मागणी केली आहे. मात्र, तेथेही १०० किलो व्हॅट क्षमतेचे रोहित्र शिल्लक नसल्याचे नागरिकांना सांगण्यात येत आहे. यामुळे अक्कलकुव्वा अंधारातच राहण्याची शक्यता आहे.