प्रशासनाच्या आश्वासनानंतर माजी सरपंचांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:31 IST2021-03-27T04:31:15+5:302021-03-27T04:31:15+5:30
आदिवासी विकास विभागाच्या तळोदा प्रकल्पाअंतर्गत जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेअंतर्गत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत ...

प्रशासनाच्या आश्वासनानंतर माजी सरपंचांचे उपोषण मागे
आदिवासी विकास विभागाच्या तळोदा प्रकल्पाअंतर्गत जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेअंतर्गत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात ठक्कर बाप्पा वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत अक्कलकुवा तालुक्यातील कुकडीपादर ग्रामपंचायतीने विकास कामे केली. त्यात चार दुहेरी सोलर पंपचे कामाचे १४ लाख आठ हजार ६९६, पाणीटंचाई निवारणार्थ १० हातपंपांचे पाच लाख ४४ हजार १८० व सन २०१६-१७ या वर्षातील सहा रस्त्यांच्या कामाचे २३ लाख दोन हजार रुपयांचे काम पूर्ण करण्यात आले. या तिन्ही कामांची एकूण रक्कम ४२ लाख ५४ हजार ८७६ रुपयांची रक्कम थकीत असून अद्यापपर्यंत मिळालेली नाही. ही रक्कम मिळावी म्हणून कुकडीपादरचे माजी सरपंच सांगल्या वसावे यांनी तळोदा येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, जिल्हा परिषद नंदुरबार व जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्याकडे निवेदने देऊन वारंवार चकरा मारूनही ही रक्कम मिळालेली नाही. अखेर वसावे यांनी अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती यांच्याकडील २४ मार्च २०२१ रोजीच्या आदेशान्वये अनुक्रमे दोन कोटी २३ लाख ४५ हजार ६७व ३१ लाख ७३ हजार ३२७ रुपयांचा निधी ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला आहे. आपण उपोषण मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे पत्र तहसीलदार अककलकुवा यांच्यातर्फे नायब तहसीलदार राजेश अमृतकर यांनी उपोषणकर्ता वसावे यांना दिल्यावर सायंकाळी उपोषण मागे घेण्यात आले.
ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेअंतर्गत झालेल्या कामाच्या मजुरांना व गवंडी यांना अद्यापपर्यत मजुरी न मिळाल्याने उपोषणास बसलेल्या सांगल्या वसावे यांना पाठींबा देण्यासाठी कंजाला येथील रामसिंग दुधल्या वळवी यांनीही अककलकुवा तहसीलदार यांना पत्र दिले.
अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर उपोषणास सकाळी बसलेले कुकडीपादरचे माजी सरपंच सांगल्या वसावे दुपारी तीन वाजेपर्यंत तळोदा प्रकल्पाअंतर्गत संबधित अधिकारी किंवा कुणीही कर्मचाऱ्यांनी भेट देऊन साधी विचारपूसही केली नसल्याची खंत उपोषणकर्ते सांगल्या वसावे यांनी व्यक्त केली. या वेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन विचारपूस केल्याचे त्यांनी सांगितले.