महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:17 IST2020-05-03T13:17:39+5:302020-05-03T13:17:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे ...

महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड.के.सी. पाडवी यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.
या वेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते. कोविड-१९ प्रतिबंधक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने महाराष्ट्र दिन साजार करण्यात आला.
पालकमंत्री पाडवी यांनी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोनाचे संकट परतावून लावण्यासाठी नागरिकांना एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले असून, सर्वांच्या सहकार्याने जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.
कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी नागरिकांनी प्रशानाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे व अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहनही अॅड.पाडवी यांनी केले. ते म्हणाले, कोरोना विषाणुच्या संसर्गाबाबत जनतेत जागृती झाली आहे. प्रशासनाने ही समस्या उत्तमरितीने हाताळली आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना जनतेची साथ मिळणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात पाच व्हेंटीलेटर्स असून, आणखी १० व्हेंटीलेटर्स खरेदी करण्यात येत आहेत. डायलिसीस यंत्र खरेदीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांच्या मदतीला होमगार्डची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी गृहमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. बाहेरील राज्यात असलेल्या जिल्ह्यातील शेतमजुरांना आणण्याची कार्यवाही सुरू असून, त्यांची वैद्यकीय तपसणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यात अडकलेल्या विद्यार्थी आणि मजुरांची यादी घेण्यात येत असून, त्यांना आणण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
प्रतिबंधीत क्षेत्रात नियमांचे कडकपणे पालन करण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आल्याचे पालकमंत्री म्हणाले. सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे अन्नधान्याचे ९५ टक्केपेक्षा जास्त वाटप करण्यात आले असून, केंद्र सरकारद्वारा प्राप्त तांदूळाचेदेखील ८५ टक्के वाटप करण्यात आले आहे. रेशन दुकानदारांनी अशा कठीण परिस्थितीत नागरिकांना सहाय्य करण्याच्या भूमीकेतून काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करण्यात येत असून, आतापर्यंत १३ हजार मजूर कामावर असल्याची माहिती त्यांनी दिली.