लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात ते साडे सात महिन्यापासून बंद असलेला तळोदा शहरातील शुक्रवारचा आठवडे बाजार गर्दीने फुलला होता. ग्रामीण भागातील जनतेमध्ये आठवडा बाजाराची क्रेझ आजही कायम आहे. गेल्या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवडपासून कोरोना या वैश्विक महामारीने आपल्या देशात शिरकाव केला होता. त्याचा जास्त प्रादुर्भाव होवू नये म्हणून प्रशासनाने जास्त गर्दी होणारे आठवडे बाजार, यात्रोत्सव, धार्मिक स्थळे बंद केली होती. तळोदा पालिकेनेदेखील जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गेल्या मार्चपासूनच आपल्या क्षेत्रातील शहराचा आठवडे बाजार बंद केला होता. साहजिकच या आठवडे बाजारामुळे पालिकेच्या आर्थिक उत्पन्नात परिणाम झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण जनतेमध्ये तळोदा शहरात शुक्रवारी भरणाऱ्या बाजाराचे महत्व आजही कायम आहे. कारण ग्रामस्थ बाजारहाट, किराणा, भाजीपाला व इतर वस्तु घेण्यासाठी बाजाराच्या दिवशी येत असतात. त्यामुळे बाहेरील व्यावसायिक उलाढालपाहून मोठ्या संख्येने हजेरी लावतात. परिणामी बाजारात मोठी उलाढाल होत असते.सात महिन्यापासून बंद पडलेल्या आठवडे बाजार शुक्रवारी प्रशासनाने लाॅकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यामुळे भरला होता. ग्रामीण जनतेने बाजारहाटसाठी प्रचंड गर्दी केल्यामुळे मेन रोड, स्मारक चौक, बस स्थानक परिसर, तहसील रोड गर्दीने अक्षरशः फुलले होते. नगर पालिकेने पुन्हा बाजार सुरू केल्याने काही गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते.याशिवाय बाहेरील भांडी, कपडे व्यावसायिक, फळ विक्रेते यांनीही हजेरी लावली होती. या वेळी गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती.
सात महिन्यानंतर प्रथमच तळोद्याची बाजारपेठ फुलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 12:34 PM