नवापूर शहरात लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवशी फारसा प्रभाव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:32 IST2021-04-02T04:32:11+5:302021-04-02T04:32:11+5:30

नवापूर : नंदुरबार जिल्ह्यात १ ते १५ एप्रिलपर्यंत जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या काळात दुपारी १ ...

The first day of lockdown in Navapur city did not have much impact | नवापूर शहरात लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवशी फारसा प्रभाव नाही

नवापूर शहरात लाॅकडाऊनच्या पहिल्या दिवशी फारसा प्रभाव नाही

नवापूर : नंदुरबार जिल्ह्यात १ ते १५ एप्रिलपर्यंत जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या काळात दुपारी १ वाजेपर्यंत काही आस्थापनांची सेवा सुरू ठेवण्याचा आदेश असला तरी इतर दुकानेही नवापूर शहरात सुरूच राहिल्याने लाॅकडाऊनच्या पहिल्याच दिवशी फज्जा उडाल्याची स्थिती होती.

या वेळी नाशवंत वस्तूंची दुकाने, मिठाई, बेकरी पदार्थ, चिकन, मटण, मासे, फळे, भाजीपाला, रसवंतीगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ यांना घरपोच पार्सल सेवा देण्यास सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी संचारबंदीत नवापूर शहरात काही दुकाने उघडी दिसून आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने बहुतांश दुकाने दुपारपर्यंत उघडी राहिली. यात इलेक्ट्रिक, मोबाइल, चप्पल, कापड दुकान, जनरल स्टोअर्स, पानटपऱ्या उघड्या होत्या.

नवापूर शहरात सकाळी व्यापाऱ्यांनी लाॅकडाऊनला प्रचंड विरोध करीत तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदारांना दुकाने उघडी ठेवण्याची विनंती केली. परंतु तहसीलदार मंदार कुलकुर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करावे, असे व्यापाऱ्यांना सांगितले. मात्र नगरपालिका प्रशासनाने उघडलेली इतर दुकाने बंद करण्याची तसदी का घेतली नाही, असा प्रश्न उपस्थित होत असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला पालिकेने केराची टोपली दाखवली का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून कोरोना रुग्ण्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी १ ते १५ एप्रिलपर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे. परंतु संचारबंदीला नवापूर शहरात फारसा प्रतिसाद दिसून आला नाही. या वेळी अनेक आस्थापने उघडी असल्याचे दिसून आले.

नवापूर पोलीस प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करीत नवापूर शहरातील सर्व प्रमुख रस्ते बॅरिकेट्स लावून बंद केले आहेत. दरम्यान, काही हॉटेल्समध्ये ग्राहक नाश्ता करीत असतानाही दिसून आले. हॉटेल व्यवसायिकदेखील आदेशाचे पालन करीत नाहीत.

पहिल्या दिवशी संचारबंदीत अनेक दुकाने उघडी असल्याने काही व्यापाऱ्यांनी प्रशासन दुजाभाव करीत असल्याचा आरोप करीत दुसऱ्या दिवशी दुकाने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा प्रशासनाने संचारबंदी ही नागरिकांच्या हितासाठी लागू केली आहे. यात व्यापाऱ्यांचे नुकसान होत असले तरी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काही दिवस दुकाने बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी केले आहे.

नवापूर शहरातील काही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडी ठेवली होती. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाठवून दुकाने दुपारी १० ते ११ वाजता बंद केली. तसेच काही व्यापारी मुद्दाम दुकाने उघडी ठेवत आहेत. नगरपालिका प्रत्येक दुकानदारापर्यंत पोहोचू शकत नाही. आम्ही तीन दिवसांपासून शहरात रिक्षा फिरवून त्याबाबत सूचना देत आहोत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोणती दुकाने सुरू राहतील, काेणती नाही, ते दुकानदारांना सांगितले आहे. शुक्रवारी आदेशातील दुकानेच सुरू राहून अन्य सर्व दुकाने बंद राहतील.

- महेश चौधरी, मुख्याधिकारी, नगरपालिका, नवापूर

Web Title: The first day of lockdown in Navapur city did not have much impact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.