अतिदुर्गम भागात लसीकरणाची भीती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST2021-05-13T04:31:09+5:302021-05-13T04:31:09+5:30

ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुविधा उपलब्ध आहे. शहरात जशी लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे, तशी अनिवार्य ...

Fear of vaccination persists in remote areas | अतिदुर्गम भागात लसीकरणाची भीती कायम

अतिदुर्गम भागात लसीकरणाची भीती कायम

ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुविधा उपलब्ध आहे. शहरात जशी लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे, तशी अनिवार्य नसून, केवळ आधार कार्ड व इतर ओळखपत्रांच्या आधारावर लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, तरीही दुर्गम भागातील अनेक नागरिक आजही लस घेण्याबाबत फारसे जागरूक नाहीत. त्यांच्यात लसींबाबत आजही अनेक गैरसमज आहेत. सातपुड्यात अनेक आदिवासी पाडे आहेत, अशा दुर्गम भागातील नागरिकांमध्ये लसींबाबत जनजागृती करण्यात सरकारी यंत्रणाही अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बहुसंख्य आदिवासी पाडे व दुर्गम भागातील आदिवासी बांधव लसीकरणापासून वंचित राहणार असल्याचे दिसून येत आहे. लसीकरणाबाबत दुर्गम भागातील नागरिकांना नेमके लसीकरण कुठे आणि कसे होणार, याचीही माहिती यंत्रणेकडून व्यवस्थित मिळत नसल्याने आम्ही लसीकरणासाठी कुठे जावे, याबाबतही दुर्गम भागातील नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. आमच्या गावापासून शहर दूर असल्याने लसीकरणासाठी वाहनाची व्यवस्थाही नाही, तर मग आम्ही लस घ्यायला लसीकरण केंद्रापर्यंत जाऊ तरी कसे, अशी प्रतिक्रिया सातपुड्यातील तोरणमाळ परिसरातील तरुणाने दिली आहे.

लसीपेक्षा वनौषधींवरच अधिक विश्वास

शहरी भागात कोरोना प्रतिबंधक लस मिळविण्यासाठी नागरिकांची वणवण होताना सध्या दिसत आहे. लसीकरण केव्हा होणार याची चिंता शहरवासीयांना लागलेली असताना, जिल्ह्यातील सातपुड्यातील आदिवासी समाज तर लसीकरणापासून कोसो दूर आहेत. हा समाज लस घेण्यासाठी पुढेच आलेला नाही. त्यामुळे समाजातील एक वर्ग लस मिळण्यासाठी धडपडत असून, दुसरा वर्ग असा आहे की, ज्याला लसीपेक्षा आयुर्वेदिक काढा आणि वनौषधींवरच अधिक विश्वास आहे. आम्हाला काहीही होत नाही निसर्ग आमचा मायबाप आहे. आम्ही सकाळी सूर्याच्या उन्हात असतो, अशी त्यांची भूमिका असून, ही लस घेतल्यानंतर माणूस जगत नाही, अशी त्यांना भीती वाटते. लसीमुळे ताप येतो, म्हणजे ती तापाची सुरुवात आहे, असाही त्यांचा गैरसमज आहे. आम्हाला कोरोना झालाच नाही, मग आम्ही लस का घ्यायची, अशीही त्यांची भूमिका आहे.

व्यापक जनजागृतीची गरज

कोरोनाबाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, त्यामुळे शहरी भागात लसीकरणासाठी रोज़च रांगा लागत आहेत. मात्र, दुसरीकडे जिल्ह्याच्या सातपुड्यातील दुर्गम भागातील आदिवासी समाज लसीकरणापासून कोसो दूर आहे. हा समाज अशिक्षित असल्याने त्यांच्यावर अंधश्रद्धेचा पगडा अद्याप कायम आहे. त्यामुळे या समाजाला लसीकरण केंद्रापर्यंत आणायचे झाल्यास, त्यांच्यातील अंधश्रद्धेला दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. लसीकरणाच्या फायद्यांबाबत त्यांच्यात जनजागृती करणे अधिक महत्त्वाचे आहे. यासाठी काही ठिकाणी प्रयत्नही सुरू झाले आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी गावे, पाडे येथे लसीकरणाची नेमकी परिस्थिती काय आहे, याचा ‘लोकमत प्रतिनिधी’ने घेतलेला हा आढावा..

गैरसमज दूर करावे

जवळील लसीकरण केंद्रावर गेल्यानंतर १८ वर्षांवरील तरुणांना लस दिली जात नसल्याने, तरुणांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात सध्या रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनातील लसीबाबतचे गैरसमज दूर करून जास्तीतजास्त लसीकरण कसे होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

आम्ही सहसा डॉक्टरकडे जात नाही. झाडपाल्याचा उपयोग अधिक करतो. त्यामुळे कोरोना लसीकरणावर आमच्या लोकांचा विश्वास नाहीच. त्यामुळे लसीकरण करून घेत नाही.

- वनसिंग भिल, नंबरपाडा, रहिवासी

Web Title: Fear of vaccination persists in remote areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.