कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:31 IST2021-05-19T04:31:59+5:302021-05-19T04:31:59+5:30
नंदुरबार : कोरोनाचे आगमन होण्यापूर्वी जिल्ह्यात उन्हाळ्याच्या प्रारंभी जिल्हा, तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर उष्माघात कक्ष तयार करून ते ...

कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला !
नंदुरबार : कोरोनाचे आगमन होण्यापूर्वी जिल्ह्यात उन्हाळ्याच्या प्रारंभी जिल्हा, तालुका आणि प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर उष्माघात कक्ष तयार करून ते कार्यान्वित केले जात होते. परंतु, गेल्या दोन वर्षांत उन्हाळ्यात लाॅकडाऊन सुरू राहत असल्याने हे कक्ष तयार करणे थांबविण्यात आले आहेत.
जिल्ह्यात उष्माघाताने नागरिकांवर मृत्यू ओढवण्याचे प्रमाण हे नगण्य आहे. परंतु तापमानाचा पारा ४२ पर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक होण्याची शक्यता असल्याने २०१९ पर्यंत प्रत्येक ठिकाणी १० खाटांचे उष्माघात कक्ष तयार करण्यात येत होते. लग्नसराईत बाहेरगावाहून आलेले तसेच कामगार यांना या कक्षाचा बऱ्यापैकी लाभ झाल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. परंतु २०२० मध्ये कोरोना महामारीमुळे वेळोवेळी सुरू राहणारा लाॅकडाऊन या कक्षांना टाळे लावणारा ठरला आहे. विशेष म्हणजे गत दोन वर्षांत उष्माघाताचा एकही रुग्ण जिल्हा रुग्णालय किंवा इतर कुठे दाखल झालेला नाही.
ऊन वाढले तरी
जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असले तरी उकाडा कायम आहे. तत्पूर्वी तापमानाने ४० अंशाचा टप्पा पार केला होता. सलग आठवडाभर तापमानवाढीमुळे उकाडा होत होता. परंतु लाॅकडाऊन असल्याने नागरिक दुपारी घराबाहेरच पडत नसल्याने वाढलेले तापमान जाणवले नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
उन्हाळा घरातच..
मार्च २०२० पासून सुरू झालेले लाॅकडाऊन तीन महिने सुरू होते. यानंतर यंदाही एक एप्रिलपासून सुरू झालेले लाॅकडाऊन टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आले. यातून नागरिकांचा उन्हाळा घरातच गेला आहे. गरजेची कामे सकाळच्या वेळेत होत आहेत. दुपारी बाहेर पडण्याचे कारण नसल्याने उन्हाचा सामना टळतो आहे.