बाप-लेक जागीच ठार, सहाजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 11:55 IST2020-03-05T11:55:20+5:302020-03-05T11:55:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : दोन ट्रकांमध्ये जीप दाबल्या गेल्याने झालेल्या अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण जखमी ...

बाप-लेक जागीच ठार, सहाजण जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : दोन ट्रकांमध्ये जीप दाबल्या गेल्याने झालेल्या अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण जखमी झाल्याची घटना शेवाळी-नेत्रंग महामार्गावर नयनशेवडी फाट्यानजीक घडली. महामार्गावरील खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
गणेश भामण्या वसावे (५०) व रिना गणेश वसावे (७ वर्ष) रा.मोराबा हे जागीच ठार झाले आहेत. तर चंद्रसिंग अमरसिंग वळवी रा. मोरांबा, सुभाष मोहनसिंग वसावे नयन शेवडी, राधिका निलेश वसावे खालचापाडा, करीनाबाई भामट्या वळवी, रा.मोरंबा या गंभीर जखमींना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहित राजू वसावे व मोगरी राजू वसावे रा.जामली हे किरकोळ जखमी असल्याने अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक बाळापुरे हे उपचार करत आहेत.
अक्कलकुवा ते खापर दरम्यान नयन शेवडी फाट्याजवळ जीप (क्रमांक एमएच ४१ सी- ३७५६) व ट्रक (क्रमांक एमएच २१ एक्स- ७८०१) व (क्रमांक एमएच ४० बी एल १२६२) यांच्यात भीषण अपघात झाला. वडील व मुलीचा जागीच मृत्यू. अन्य सहा जण जखमी झाले असून यापैकी चार गंभीर जखमींना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
तीनही वाहने खापर कडून अक्कलकुवा च्या दिशेने येत असताना पुढे अवजड कंटेनर मध्ये बोलेरो गाडी व त्यामागे ट्रक येत असताना मधली बोलेरो गाडी या दोन्ही अवजड वाहनांच्या मध्ये दाबली गेल्याने हा विचित्र अपघात झाला.
सध्या देव मोगरा मातेची यात्रा सुरू असून हे भाविक मातेच्या यात्रेसाठी देव मोगरा येथून परत आपल्या गावी येत असताना अक्कलकुवा ते खापर दरम्यान असलेल्या नयन शेवडी गावाजवळ हा अपघात झाला.
घटनेची माहिती मिळताच अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात जवळ असलेल्या गुजरात राज्यातील मोरांबा येथील मयताच्या गावातील लोकांनी मोठी गर्दी केलेली होती. मयताच्या नातेवाईकांचा रुग्णालयातील आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. घटनास्थळी अक्कलकुवा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर, डी. डी. पाटील, पोलीस निरीक्षक गायधने यांनी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हलविले. या महामार्गावर अतिशय जीवघेणे खड्डे पडले असल्याने होणाऱ्या अपघातात वाढ झाली असून हा महामार्ग अजुन किती लोकांचे बळी घेईल असा प्रश्न उपस्थित होत आहे.