पाऊस हुलकावणी देत निघून जात असल्याने शेतकरी चिंतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST2021-07-24T04:19:22+5:302021-07-24T04:19:22+5:30
शेतकरी या हंगामात चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत असताना यंदा ही पावसाने पाहीजे तशी या परिसरात साथ दिली नाही. मृग बेभरवशाचा ...

पाऊस हुलकावणी देत निघून जात असल्याने शेतकरी चिंतीत
शेतकरी या हंगामात चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत असताना यंदा ही पावसाने पाहीजे तशी या परिसरात साथ दिली नाही. मृग बेभरवशाचा गेल्याने शेतकऱ्यांची मदार आद्र नक्षत्रावर होती. मात्र, या नक्षत्रात दमदार पाऊस आला नाही. त्यानंतर सूर्याचा पुनर्वसू नक्षत्राचे वाहन उंदीर असल्याने पाऊस पडेल, अशी आशा होती. मात्र, या तिन्ही नक्षत्रात पाऊस बरसला नाही. त्यामुळे दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. सोमवारपासून सूर्याचा पुष्य नक्षत्रात प्रवेश झाला आहे. या नक्षत्राचे वाहन घोडा असून, या घोड्यावर शेतकऱ्यांची मदार आहे. घोडा जर जोरात धावला नाही तर शेतकऱ्यांना उत्पन्नाचा जबर फटका बसल्याशिवाय राहणार नाही. हे मात्र नक्कीच.
कमी पाऊसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे.
महागडे बियाणे व खते वाया जात असल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहेत. कापसाची मोड करून त्या जागेवर सोयाबीनची पेरणी केली. परंतु कमी पाऊसामुळे उगवन क्षमता नसल्याने सोयाबीन पीकही मोडणीवर आले आहे. मे-जूनमध्ये कापसाची लागवड केली होती. ही पिके डौलदार असल्याने पीक शेतकऱ्यांना खुणावत आहे. परंतु समाधानकारक पाऊस पडत नसल्याने पुढे हे पीक टिकेल की नाही याचा भरवसा नाही, पाऊस दमदार आला नसल्याने नाले भरून गेले नाहीत, जमीन ओलीत असल्यासारखा पाऊस असल्याने कापसाचे पीक बहरलीत, मात्र पिकांना बहर, फुले, फळे येण्याकरिता जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे. त्यामुळे आता पुष्य नक्षत्रावर शेतकऱ्यांचा भरोसा असून, या नक्षत्रात दमदार पाऊस आल्यास शेतातील पिके वाचतील, अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहे.
दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
तापी, गोमाई काठासह परिसरात जून व जुलै महिना संपण्यात आला तरी अजून दमदार पाऊस बरसलेला नाही. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणी केलेले कापूस, मूग, उडीद, सोयाबीन आदी पिके मोड आलेली आहेत, दुबार पेरणी करूनही पाऊस आलेला नाही. त्यामुळे तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवलेले आहे. मशागत, महागडे बियाणे, खते, कीटकनाशके यांचा खर्च वाया गेलेला आहे. त्यामुळे शासनाने नंदुरबार जिल्ह्यासह तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.