कृषी विभागाने लागवड केेलेल्या फळझाडांचे उत्पन्न घेणार शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:31 IST2021-05-21T04:31:54+5:302021-05-21T04:31:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कृषी विभागाने गेल्या वर्षात जिल्ह्यातील ३६ महसुली मंडळात एक हजार ८०० हेक्टर क्षेत्रात फळझाडांची ...

Farmers will get the income from the fruit trees planted by the agriculture department | कृषी विभागाने लागवड केेलेल्या फळझाडांचे उत्पन्न घेणार शेतकरी

कृषी विभागाने लागवड केेलेल्या फळझाडांचे उत्पन्न घेणार शेतकरी

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : कृषी विभागाने गेल्या वर्षात जिल्ह्यातील ३६ महसुली मंडळात एक हजार ८०० हेक्टर क्षेत्रात फळझाडांची लागवड केली होती. ही झाडे सुस्थितीत असून, त्यांची वाढही झाली आहे. कृषी विभागाने संगोपन करून वाढवलेल्या या झाडांची देखभाल यापुढेही कृषी विभाग करणार असून, त्याची फळे मात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी विभागाकडून हा प्रयोग राबवला जात आहे. जिल्ह्यातील ८६ टक्के फळझाडे लागवडीच्या वर्षभरानंतर चांगल्या स्थितीत असल्याची माहिती विभागाने दिली आहे.

३३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत कृषी विभागाने एक लाख ७४ हजार ६४८ झाडांची लागवड २०१९ मध्ये केली होती. विविध भागात लागवड केलेल्या या झाडांचे संगोपन त्या त्या मंडळात नियुक्त कृषी सहायकांमार्फत करून घेण्यात आले होते. यातील ७० टक्के झाडे ही जगली असून, त्यांची उंची ही सात ते आठ फुटांपेक्षा अधिक वाढली आहेत. गेल्या वर्षात जिल्ह्याला ३९ हजार झाडे लागवडीचे ध्येय होते. परंतु यावर जात कृषी विभागाने एक हजार ८०० हेक्टरमध्ये ४० हजारांपेक्षा अधिक झाडांची लागवड केली होती. ही झाडे प्रामुख्याने वार्षिक व उत्पादन देणाऱ्या फळांची आहेत. येत्या पाच वर्षानंतर ही झाडे उत्पादन देण्यास सक्षम असतील.

जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात कृषी विभाग साधारण दोन हजारपेक्षा अधिक हेक्टरवर फळझाडांची लागवड करून त्यांचे संगोपन करणार आहे. कालांतराने ही झाडे शेतकऱ्यांना सोपवली जातील. जिल्ह्याने गेल्यावर्षी लागवड क्षेत्रात नाशिक विभागातून आघाडी घेतली होती. यामुळे यंदाही दोन हजार किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात आघाडी घेतली जाण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दुर्गम भागात भेट देत धडगाव येथील रोपवाटिकेची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी कृषी विभागाला सीडबाॅल संकल्पना राबविण्याचे सूचित केले होते. या संकल्पेनुसारही कामकाज करण्याची तयारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडून सुरू झाली आहे. त्यानुसार कामकाज होणार आहे. तूर्तास सर्व ३६ रोपवाटिकांमध्ये फळझाडांची लागवड वाढवण्यात आली आहे.

गेल्यावर्षीप्रमाणे प्रत्येकी सहा हेक्टर क्षेत्रानुसार वृक्ष लागवड सुरू होणार आहे. एकूण २२८ कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून जिल्ह्यात ही लागवड होणार आहे.

गेल्या वर्षात एक हजार ८०० हेक्टरवर लागवड केलेली फळझाडे ही चांगल्या स्थितीत आहेत. त्यांचे संगोपन चांगल्या प्रकारे झाल्याने वाढ झाली आहे. या झाडांची फळे ही त्या त्या भागातील शेतकऱ्यांना दिली जातील. यातून रोजगार मिळू शकतो. यंदाही जिल्ह्याच्या विविध भागात वृक्ष लागवड करण्याची तयारी आहे. विशेषकरून फळ झाडांवर लक्ष राहील. कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून ही फळ झाडे जिल्ह्याच्या विविध भागात लागवड करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

-अनंतराव पोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नंदुरबार

Web Title: Farmers will get the income from the fruit trees planted by the agriculture department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.