शेती परवडत नसल्याने उक्ते देण्याकडे शेतकऱ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:32 IST2021-05-20T04:32:28+5:302021-05-20T04:32:28+5:30

जयनगर : ग्रामीण भागाचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शहादा तालुक्यातील जयनगरसह परिसरातील गावांमध्ये मशागतीची तयारी जोरात दिसत असली ...

Farmers tend to give up as agriculture is unaffordable | शेती परवडत नसल्याने उक्ते देण्याकडे शेतकऱ्यांचा कल

शेती परवडत नसल्याने उक्ते देण्याकडे शेतकऱ्यांचा कल

जयनगर : ग्रामीण भागाचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शहादा तालुक्यातील जयनगरसह परिसरातील गावांमध्ये मशागतीची तयारी जोरात दिसत असली तरी निसर्गाच्या तडाख्यामुळे तसेच दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे भांडवली खर्च शेतीत परवडत नाहीये. म्हणून परिसरातील अनेक शेतकरी आपली जमीन उक्ते देण्याकडे देताना दिसून येत आहेत.

दोन वर्षांपासून पावसाळा समाधानकारक होत असला तरी एका मागून एक येणाऱ्या संकटांमुळे शेतकरी बेजार झाला असून, आजच्या घडीला शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही. म्हणून अनेक शेतकरी आवाक्याबाहेर लागत असलेल्या भांडवली खर्चामुळे आपली शेती उक्ते देताना दिसत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे एक ते चार एकरपर्यंत शेती आहे, असे शेतकरी मोठे बागायतदार शेतकऱ्यांना एकरी १० ते १५ हजारांपर्यंत नफ्याने जमीन कसायला देत आहेत.

गेल्या १५ महिन्यांपासून कोरोना महामारीचे संकट जाता जात नाहीये. त्यात निसर्गाने अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळ यासारखे संकट निर्माण केल्याने अनेक वेळा शेतकऱ्यांचे शेतीसाठी लावलेले भांडवलही निघत नाही. त्यामुळे जे शेतकरी उधार - उसनवारीने पैसे घेऊन आपल्या शेतीत भांडवल लावत असतात ते दिवसेंदिवस अधिकच कर्जबाजारी होत आहेत.

नैसर्गिक आपत्तीसह शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत.

कोरोना महामारीमुळे अनेकदा बाजारपेठा बंद आहेत, अशावेळी व्यापारीही माल घेण्यासाठी फिरकत नाही. जे मोजके व्यापारी येतात ते परिस्थितीचा फायदा उचलून मनमानी भावाने शेतकऱ्यांचा माल मागत असतात. त्यामुळे अशा परिस्थितीत सामान्य शेतकरी शेती करणार कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

रासायनिक खते, बी - बियाणे यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मजुरांच्या टंचाईमुळे वाढलेली मजुरी, सतत उद्भवणारी बोंडअळी, वाहतुकीचा वाढलेला खर्च, जमीन मशागतीचे वाढलेले दर, उत्पन्नात झालेली घट यासारख्या असंख्य समस्यांना सध्या शेतकरी तोंड देत आहे. त्यामुळे हताश होऊन अनेक सामान्य शेतकरी आपली जमीन मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांना एक - दोन वर्षाच्या बोलीवर नफ्याने कसण्यासाठी देत आहेत. पूर्वी जे नोकरदार शेतकरी बाहेरगावी नोकरीस होते. तेच आपली जमीन उक्ते देत होते. मात्र आता वर्षानुवर्षे शेती करणारा सधन शेतकरीही शेतीमध्ये येत असलेल्या असंख्य अडचणी तसेच भांडवली खर्च परवडत नसल्यामुळे आपली जमीन निम्मे बटाई किंवा उक्ते देत असल्याचे दिसून येत आहे.

कोरोना काळात सगळ्यांचे भाव वाढले. मात्र शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही.

कोरोना या संसर्गजन्य आजारापासून लोकांचा बचाव व्हावा, म्हणून शासनाने अनेकदा कडक निर्बंध तसेच संचारबंदी लागू केली. याचा फायदा सर्व व्यापारी तसेच अनेक धंदेवाईकांना झाला. संचारबंदीमुळे किराणा मालाचे भाव गगनाला भिडले आहेत. शेतीयोग्य वस्तू यामध्ये बी-बियाणे, रासायनिक खते, अवजारे या सारख्या गोष्टींचे भाव वाढतच आहेत. शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत घेऊन जायचा असेल तर कोरोनाच्या नावाखाली वाहतुकीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कोरोना काळात घर बांधण्यासाठी लागणारे विटा, सिमेंट, लोखंड, कारागीर यांचे दर वाढले. हार्डवेअरचे वस्तू, नवी मोटारसायकल अशा अनेक गोष्टी असतील की, त्यांचे भाव वाढले. मात्र शेतकऱ्याचे नशीब असे आहे की, आयुष्यभर राबराब राबून दुसऱ्याच्या तोंडात अन्नाचा घास भरविणारा आज चोहोबाजूंनी संकटात सापडलेला आहे. आणि त्याच्याच मालाला भाव भेटत नाहीये. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून, कर्जबाजारीपणामुळे हताश होऊन शेती करणे नकोशी वाटत असल्याने जमीन दुसऱ्या शेतकऱ्याला निम्मे बटाई अथवा उक्ते देणे पसंत करीत आहे.

Web Title: Farmers tend to give up as agriculture is unaffordable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.