‘अंदाजपंचे’ला कंटाळले शेतकरी..’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:21 IST2021-07-10T04:21:45+5:302021-07-10T04:21:45+5:30
हवामान विभाग नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या एक महिन्यापासून नुसतीच आस लावून ठेवत आहे. ‘अंदाजपंचे...’ या उक्तीप्रमाणे एक महिन्यांपासून वेळ ...

‘अंदाजपंचे’ला कंटाळले शेतकरी..’
हवामान विभाग नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या एक महिन्यापासून नुसतीच आस लावून ठेवत आहे. ‘अंदाजपंचे...’ या उक्तीप्रमाणे एक महिन्यांपासून वेळ निभावून नेणाऱ्या या विभागाचा अंदाजच आता शेतकरी नजरअंदाज करू पाहत आहेत. पावसाळ्याचे ३० दिवस असेच गेले. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली, ते पीक वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत, तर ज्यांची पेरणी बाकी आहे, ते पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा सरासरीएवढा पाऊस होईल, वेळेवर पाऊस येऊन पेरण्या जुलैपर्यंत आटोपल्या जातील, यंदा पीक परिस्थिती उत्तम राहील, असा अंदाज मे महिन्यातच हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला होता. त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात होता. नंदुरबार जिल्ह्यापुरता विचार करता, पावणेतीन लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत अवघ्या १३ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. दर आठ दिवसांत हवामान विभागातर्फे पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. तुरळक, हलका, मध्यम स्वरूपाचा, ढगांच्या गडगडाटासह, वादळवाऱ्यासह पाऊस येण्याचे अंदाज गेल्या महिनाभरापासून शेतकरी ऐकत आहेत, वाचत आहेत, परंतु वरुणराजा सर्वांनाच हुलकावणी देत आहे. आता विश्वास ठेवावा, तर कुणावर, असा प्रश्न बळीराजा स्वत:लाच विचारत आहे. सद्याही राज्यातील अनेक भागांत मध्यम ते जोरदार पाऊस सुरू असताना, नंदुरबार जिल्ह्यात मात्र कडक ऊन पडून तापमान ३८ ते ३९ अंशावर जात आहे. एकीकडे पावसाची शक्यता वर्तविताना, दुसरीकडे ऑक्टोबर हिटसारख्या स्थितीला सामोरे जावे लागत असल्याने, शेतकऱ्यांना ‘अंदाजपंचे...’चा कंटाळा आला आहे. शेतकरी आता वरुणराजाला ‘एकदाचा दणकून बरस बाबा’ अशी आर्त विनवणी करीत आहे.
-मनोज शेलार, नंदुरबार.