खोट्या सह्या, बनावट बिले आणि बोगस विकासकामांची यादी देत झाला गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 12:21 IST2021-02-17T12:21:28+5:302021-02-17T12:21:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा ग्रामपंचायतीत ४ कोटी ७५ लाख रूपयांच्या गैरव्यवहारप्रकरणाची चाैकशी विस्तार अधिका-यांच्या त्रिस्तरीय समितीने शनिवारी ...

False signatures, forged bills and bogus development lists were misused | खोट्या सह्या, बनावट बिले आणि बोगस विकासकामांची यादी देत झाला गैरव्यवहार

खोट्या सह्या, बनावट बिले आणि बोगस विकासकामांची यादी देत झाला गैरव्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा ग्रामपंचायतीत ४ कोटी ७५ लाख रूपयांच्या गैरव्यवहारप्रकरणाची चाैकशी विस्तार अधिका-यांच्या त्रिस्तरीय समितीने शनिवारी रात्री पूर्ण केली. चाैकशीचा अहवाल  मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आला होता. सोमवारी या अहवालावर कामकाज होवू शकलेले नसल्याने पुढे काय याकडे लक्ष लागून आहे. 
दरम्यान २०१६ ते २०२० या काळात झालेला हा गैरव्यवहार म्हणजे पदाचा दुरुपयोग करुन बनावट सह्या, बनावट बिले, खोटी विकासकामे असाच असल्याचे समोर आल्याची खात्रीलायक माहिती असून यातून चाैकशी करण्यात आलेल्या ९ जणांवर विविध जबाबदा-या ठेवत कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  
अक्कलकुवा ग्रामपंचायतीत २०१६ ते २०२० या काळात पाच टक्के पेसा निधी व चाैदाव्या वित्त आयोगातील निधीचा बेहिशोबी व मनमानी पद्धतीने खर्च करुन विकास कामे केल्याचे दर्शवण्यात आले होते. यातून ग्रामपंचायतीत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी वाढल्याने २०२० मध्ये चाैकशी समिती नियुक्त करुन ग्रामपंचायतीचे दप्तर व इतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली होती. यातून ९ जणांच्या कार्यकाळात गैरव्यवहार दिसून येत असल्याने त्यांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. नोटीसा देण्यात आलेल्यांमध्ये दोन माजी सरपंच, एक उपसरपंच, दोन प्रशासक, दोन ग्रामविकास अधिकारी, एक ग्रामसेवक आणि विद्यमान सरपंच अशा ९ जणांचा समावेश होता. या सर्वांनी नोटीसा मिळाल्यानंतर समितीला दिलेले खुलासे हे परिपूर्ण नसल्याने त्यांना पुन्हा नोटीसा देत १० फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेत पाचारण करण्यात आले होते. याठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून चाैकशी सुरु होती. यावेळीही संबधितांकडून खुलासेच देण्यात आले आहेत. शनिवारी रात्री उशिरापर्यंत २०१८-१९ व २०१९-२० या दोन वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यातून तीन दिवसाच्या चाैकशीचा अहवाल तयार करुन तो मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात आला आहे. सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अहवालाचे अवलोकन करुन पुढील निर्णय घेणार होते परंतू पालकमंत्र्यांच्या बैठकीमुळे अडचणी आल्या होत्या. मंगळवारी त्यावर कामकाज होत होते. अक्कलकुवा ग्रामपंचायतीच्या या गैरव्यवहार प्रकरणात नेमके कोणाच्या कारकिर्दित कोणता, गैरव्यवहार झाला याचा शोध घेताना आधीची चार सदस्यीय समिती आणि आता ग्रामसेवकांचे दप्तर तपासणी करणारी त्रिस्तरीय समिती गोंधळात पडले होते. कोणत्याच कागदाच कुठेही मेळ बसत नसल्याने ग्रामपंचायतीचा आर्थिक हिशोबच कळत नसल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान पुढे काय, कारवाई होणार याकडे लक्ष लागून राहणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर राैंदळ यांना संपर्क केला असता, नियमाप्रमाणे चाैकशी पूर्ण केली आहे. अहवालाची पडताळणी करुन पुढील कारवाई होणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे. 

अधिकाऱ्यांच्या केल्या बनावट सह्या  
 दरम्यान या गैरव्यवहार प्रकरणाच्या अनेक बाबी उघड होत आहेत.यात १४ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामसेवक एस.आर.कोळी यांनी पाच मिनी वाॅटर सप्लायची एक लाखाच्या आतील कामे केल्याची नोंद केली होती. मे, जून, जुलै २०२० या काळात कॅश बुकात या कामांच्या नोंदी आहेत. यावर अक्कलकुवा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या एका अधिका-याच्या सह्या आहेत.परंतू संबधित अधिकारी हे २०१९ मध्येच अक्कलकुवा येथून नंदुरबार येथे बदलून गेल्याने या प्रकरणाचे गांभिर्य वाढले आहे. २०२० मध्ये बनावट सह्या करण्याचे उघडकीस आल्याने २०१६ पासूनच्या गैरव्यवहाराची पाळमुळे आणखी गंभीर असल्याचे प्रशासकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

कारवाई न झाल्यास राणा यांचा उपोषणाचा इशारा 
दरम्यान याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास २२ फेब्रुवारीपासून पंचायत समितीसमोर उपोषण करणार असल्याचा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती इंद्रपालसिंह राणा यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना दिले आहे. निवेदनात, अक्कलकुवा ग्रामपंचायतीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचाराची चाैकशी सुरु आहे. परंतू ठाेस अशी कारवाई झालेली नाही. बोगस बिले देत लाखाे रुपये ग्रामपंचायतीच्या बँक खात्यातून काढण्यात आली आहेत. सोबत अक्कलकुवा ग्रामपंचायतींच्या मालकीचे गाळेही पदाधिकारी यांनी परस्पर वाटप करुन घेतले आहेत. यामुळे या प्रकाराची गांभिर्याने दखल घ्यावी अन्यथा २२ फेब्रुवारीपासून समर्थकांसह आंदोलन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. निवेदनामुळे या प्रकरणाचे गांभिर्य आणखी वाढले असून अक्कलकुवा शहरात या गैरव्यवहाराची सध्या चर्चा सुरु आहे. 

Web Title: False signatures, forged bills and bogus development lists were misused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.