जामियातर्फे सहा हजार विद्यार्थ्यांना दिल्या सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 13:21 IST2020-04-09T13:21:18+5:302020-04-09T13:21:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : शहरातील जामिया इस्लामिया इशाअतुल उलूम या मदरशात अद्यापही सहा हजार विद्यार्थी मुक्कामी असून लॉकडाऊनमुळे ...

जामियातर्फे सहा हजार विद्यार्थ्यांना दिल्या सुविधा
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : शहरातील जामिया इस्लामिया इशाअतुल उलूम या मदरशात अद्यापही सहा हजार विद्यार्थी मुक्कामी असून लॉकडाऊनमुळे हे विद्यार्थी येथे अडकून पडले आहेत़ हे सर्व विद्यार्थी परराज्यातील रहिवासी असून लॉकडाऊन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना गावी रवाना करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे़ तूर्तास येथे थांबलेल्या या विद्यार्थ्यांना सर्व सुविधा दिल्या जात असून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय पथक संस्थेने स्वखर्चाने तैनात केली आहेत़
अक्कलकुवा येथील जामिया संस्थेत मोठ्या संख्येने देश तसेच विदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात़ यंदाही सुमारे १२ हजार विद्यार्थी येथे शिक्षणासाठी आले होते़ एप्रिल पूर्वी या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र संपणार असल्याने बहुतांश विद्यार्थी मार्चच्या मध्यात घराकडे रवाना झाले होते़ सुमारे सहा हजार विद्यार्थी घराकडे गेले असताना २२ मार्चनंतर लॉकडाऊनचा कालावधी सुरु झाल्याने बहुतांश विद्यार्थी येथे अडकून पडले आहेत़ या विद्यार्थ्यांचे रेल्वे आणि बसचे रिझर्व्हेशन ३ एप्रिल रोजी होते़ परंतू लॉकडाऊनमुळे हे विद्यार्थी सध्या जामिया वसतीगृहातच अडकून पडले आहेत़ मंगळवारी या विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था तसेच जामिया संस्थेतील सोयी सुविधांचा आढावा प्रशासनाकडून घेण्यात आला़ यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ स्वप्नील मालखेडे, डॉ़ गयधर, डॉ़ प्रदीप गोयल, डॉ़ स्वप्नील चौधरी, आरोग्य सहायक अभितन पावरा यांच्यासह आरोग्य सहायक व सेवक उपस्थित होते़ त्यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या विविध सोयी सुविधांची माहिती संकलित करण्यात आली़ डॉ़ मालखेडे यांनी विद्यार्थ्यांना कोरोना संदर्भातील उपाययोजनांची माहिती देत सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि सॅनेटायझर व हँडवॉशचा वापर करण्याच्या सूचना केल्या़ जामिया अहमद गरीब युनानी रुग्णालयाचे संचालक मंडळ व वैद्यकीय अधिकारी भेटीदरम्यान उपस्थित होते़ येथील विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत गेल्या १५ दिवसांपासून सूचना करण्यात येत आहे़
सद्यस्थितीत मदरशात ६ हजार ४८९ विद्यार्थी लॉकडाऊनमुळे अडकले आहेत़ हे विद्यार्थी सध्या वसतीगृहात निवासी म्हणून आहेत़ सर्वाधिक ३ हजार ३२४ विद्यार्थी हे बिहार राज्यातील आहेत़ महाराष्ट्र ८४१, आसाम ८८३, पश्चिम बंगाल ३७७, झारखंड ३५०, मध्यप्रदेश १३५, उत्तर प्रदेश १२०, गुजरात ७५, मणिपूर ७२, जम्मू आणि काश्मिर ६४, कर्नाटक ६४, हरीयाणा ५५, राजस्थान ४६ दिल्ली ३६, आंध्रप्रदेश १३, मेघालय १२, ओरिसा ८, हिमाचल प्रदेश ४, तेलंगणा ४, गोवा २ तर पंजाब राज्यातील एक विद्यार्थी येथे थांबून असल्याची माहिती आहे़
येथे मुक्कामी असलेल्या सर्व सहा हजार विद्यार्थ्यांचे त्यांच्या गावी परत जाण्यासाठी ३ एप्रिल रोजी रेल्वे आणि बसेसचे आरक्षण होते़ तशी तरतूद त्यांनी आधीच करुन ठेवली होती़ परंतू लॉकडाऊनमुळे रेल्वे आणि बस वाहतूक बंद झाल्याने या विद्यार्थ्यांना आता येथे थांबावे लागत आहे़ आवारात विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार परिसर पूर्णपणे निर्जंतुक करण्यात आला आहे़ तसेच संस्थेने कर्मचारी नियुक्त करुन स्वच्छता कायम ठेवली आहे़ औषध फवारणीसह विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्यांच्यावर सॅनेटायझर शिंपडण्यासह इतर अनेक सुविधा दिल्या जात आहेत़ विद्यार्थी एकमेकांपासून लांब राहतील यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे़ यात प्रामुख्याने दर दिवशी मास्कचा वापर करण्यासह विविध विषयांवर शिक्षक मार्गदर्शन करत आहेत़