दररोज आठ हजार शेतकऱ्यांना मिळते घरबसल्या हवामानाची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST2021-07-09T04:20:24+5:302021-07-09T04:20:24+5:30
स्थानिक ठिकाणी हवामानाची माहिती मिळावी, यासाठी ही सोय करण्यात आली आहे. या केंद्रामार्फत जिल्ह्यातील जवळपास आठ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना ...

दररोज आठ हजार शेतकऱ्यांना मिळते घरबसल्या हवामानाची माहिती
स्थानिक ठिकाणी हवामानाची माहिती मिळावी, यासाठी ही सोय करण्यात आली आहे. या केंद्रामार्फत जिल्ह्यातील जवळपास आठ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना व्हॉट्स ॲपच्या व इतर माध्यमातून दर मंगळवारी व शुक्रवारी जिल्ह्याचा आणि तालुकानिहाय हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ला देण्यात येतो. यासोबतच नुकतेच हवामानाची माहिती मिळावी, यासाठी भारतीय हवामान विभागाकडून स्वयंचलित कृषी-हवामान केंद्र बसविण्यात आले असून, दर १५ मिनिटांनी हवामानाची आकडेवारी यामध्ये संकलित केली जाते. स्वयंचलित हवामान केंद्रांमधून कमाल आणि किमान तापमान, सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग, दिशा, सूर्यप्रकाशाचा कालावधी, पाऊस, जमिनीचे तापमान आणि जमिनीतील ओलावा या सर्व नोंदी उपलब्ध होतात.पिकांच्या पेरणीपासून ते काढणीपर्यंत हवामानाची माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांना योग्य नियोजन करण्यास मदत होणार आहे.
पिकाच्या वाढीसाठी प्रामुख्याने योग्य तापमानाची गरज असते. आर्द्रतेचे प्रमाण, ढगाळ हवामान, पावसातील खंड आणि तापमान यावरून कीड व रोगांची तीव्रता अभ्यासणे शक्य होते. प्रत्येक पिकासाठी पाण्याची गरज वेगवेगळी असते. हंगामानुसारही पाण्याची गरज बदलते. या सर्व अभ्यासासाठी स्वयंचलित हवामान केंद्र अत्यंत उपयुक्त ठरते.
“स्वयंचलित कृषी-हवामान केंद्र” यामुळे तापमान, आर्द्रता, पाऊस, हवेचा वेग, जमिनीतील ओल व तापमान यांची माहिती तसेच जिल्हा कृषी हवामान केंद्रामार्फत हवामानाचा अंदाज यावर आधारित कृषी सल्ला मिळणार असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हवामान अंदाज व कृषी सल्ला मिळविण्यासाठी ८९९९२२६५६३ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे कृषी हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी केले आहे.