रमजान महिन्यातही केळीला भाव नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:22 IST2021-04-29T04:22:59+5:302021-04-29T04:22:59+5:30
मागील वर्षाच्या लॉकडाऊनप्रमाणेच यावर्षीही केळीला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. एकाच प्रकारच्या पिकाला वेगवेगळ्या ठिकाणी ...

रमजान महिन्यातही केळीला भाव नाही
मागील वर्षाच्या लॉकडाऊनप्रमाणेच यावर्षीही केळीला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. एकाच प्रकारच्या पिकाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे भाव भेटत असल्यामुळे यावर काहीतरी उपाय योजना करायला हवेत, असे सूरही शेतकऱ्यांमधून ऐकायला भेटत आहेत.
सध्या रमजानचा महिना चालू आहे. त्यामुळे केळीला सर्वांकडे मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. तरीही शहादा परिसरात व्यापाऱ्यांकडून केळी पिकाला योग्य भाव मिळत नाहीये. उत्तर भारतात तर खान्देशची केळी मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असते. जळगाव, रावेर, बुऱ्हानपूर येथे सध्या केळीला व्यापाऱ्यांकडून सार्वधिक १६०० रुपये प्रतिक्विंटल भाव दिला जात आहे. मात्र, शहादा परिसरात व्यापारी लॉकडाऊनच्या नावाखाली नवती केळीला ८०० ते ९०० रुपये प्रति क्विंटल आणि पिलबागला ५०० ते ६०० प्रतिक्विंटल असा भाव देत आहेत.
शेतकरी व्यापाऱ्यांना इतर ठिकाणी मिळत असलेले जादा दर सांगतात. मात्र, व्यापारी सध्या लॉकडाऊनचे कारण पुढे करून कमी भावात शेतकऱ्यांची केळी खरेदी करीत आहेत. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असून, रमजान महिना असल्यामुळे केळीला अधिक मागणी होताना दिसत असून, व्यापारी सर्वांकडे केळी खरेदी करताना दिसून येत आहेत. मागणी सर्वांकडे सारखीच दिसून येत असून, दरही सर्वांकडे सारखाच मिळायला पाहिजे. अशी योजना शासनाने राबवायला हवी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.