लॉकडाऊन काळातही जगाचा पोशिंदा अनलॉकच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:27 IST2021-04-12T04:27:48+5:302021-04-12T04:27:48+5:30
मागील १४ महिन्यांपासून जगावर कोरोना महामारीचे संकट जाता जात नाही. सुरुवातीला एक दिवस जनता कर्फ्यूनंतर टप्प्याटप्प्याने शासनाने लॉकडाऊन ...

लॉकडाऊन काळातही जगाचा पोशिंदा अनलॉकच
मागील १४ महिन्यांपासून जगावर कोरोना महामारीचे संकट जाता जात नाही. सुरुवातीला एक दिवस जनता कर्फ्यूनंतर टप्प्याटप्प्याने शासनाने लॉकडाऊन केल्याने सर्व उद्योगधंदे ठप्प झाले होते. मात्र, जगाचा पोशिंदा शेतकरी राजा स्वतःवर कितीही संकट आले तरी आपली कामे सुरळीतपणे चालू ठेवत आपल्या अन्नधान्यावर अवलंबून राहणाऱ्यांसाठी आपले कर्तव्य पार पाडीत आहे.
गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळाला होता. एकरी ६० ते ७० हजार रुपये खर्च करून लोकांनी पपई व केळीचे पीक घेतले होते. मात्र, त्यावेळेस खर्चही निघाला नव्हता. तसेच ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पाऊस, डिसेंबरमध्येही अवकाळी पाऊस, तसेच मार्च महिन्यात गारपीट अशा अनेक संकटामुळे शेतकरी राजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. मात्र, तरीही या सगळ्या गोष्टींचा विचार न करता आपण लावलेल्या मालाला भाव मिळेल की नाही? लॉकडाऊन काळात उत्पन्न निघाले तर तो माल विकला जाईल की नाही? यासारख्या असंख्य प्रश्नांचा शेतकरी विचार न करता आपले कर्तव्य पार पाडीत आहे.
मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यासह सगळीकडे जोरदार पाऊस झालेला आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही विहिरी, तसेच कूपनलिकांना मुबलक पाणी आहे. सध्या लॉकडाऊन काळातही जयनगरसह परिसरातील कोंढावळ, वडाळी, धांद्रे, निंभोरे, बोराळे या गावांमधील बहुसंख्य शेतकरी आपल्या शेतामध्ये पपई, केळी, ऊस यासारखी पिके लावण्यावर भर देत आहेत.
लॉकडाऊन काळात सर्व उद्योगधंदे बंद पडले तरी शेती हा असा व्यवसाय आहे की, तो कधीही बंद पडत नाही. मागीलवर्षी आमच्या केळी, पपई पिकाला अपेक्षित भाव मिळाला नसला तरी आम्ही सध्या लॉकडाऊन काळातही या पिकांची लागवड करीत आहोत.
- वैभव राजू पाटील, शेतकरी, जयनगर, ता. शहादा.