पावसाळा लागूनही वसाहती रस्त्यांविनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:21 IST2021-06-22T04:21:06+5:302021-06-22T04:21:06+5:30

खड्डे दुरुस्तीची मागणी नंदुरबार : दोंडाईचा ते नंदुरबार दरम्यान वावद गावाजवळील वळणावर रस्ता खराब होऊन खड्डे पडले आहेत. याठिकाणी ...

Even after the rains, there are no colonial roads | पावसाळा लागूनही वसाहती रस्त्यांविनाच

पावसाळा लागूनही वसाहती रस्त्यांविनाच

खड्डे दुरुस्तीची मागणी

नंदुरबार : दोंडाईचा ते नंदुरबार दरम्यान वावद गावाजवळील वळणावर रस्ता खराब होऊन खड्डे पडले आहेत. याठिकाणी खडीही उखडली असल्याचे दिसून आले आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या मार्गाने दर दिवशी शेकडो वाहनांची ये-जा सुरू असते.

दुर्गम भागात जनजागृतीची गरज

नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागात पाऊस पडल्यानंतर शेतकरी पेरण्यांना सुरुवात करतात. यासाठी शेतकरी बियाणे, खते आणि औषधीचा साठा खरेदी करण्यास प्राधान्य देतात. दरम्यान, यातून गेल्या काही वर्षात शेतक-यांची फसवणूक झाल्याचे प्रकारही घडले आहेत. यामुळे कृषी विभागाने बियाणे व खतांची माहिती देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.

अक्कलकुव्यातील समस्या कायम

अक्कलकुवा : शहरातील विविध भागात स्वच्छतेच्या समस्या कायम आहेत. ग्रामपंचायतीकडून गावात स्वच्छता कर्मचारी नियुक्त करून कामे करुन घेतली जात नसल्याचे यातून समोर आले आहे. शहरात पावसाळ्यापूर्वी स्वच्छतेची कामेही झालेली नसल्याची माहिती आहे.

माेलगी येथे बसेस सुरू करण्याची मागणी

अक्कलकुवा : सातपुड्यातील दुर्गम भागात मोलगी ते अक्कलकुवा या मार्गावर वाढीव बसेस सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. एसटी सुरू नसल्याने प्रवासी खासगी वाहनातून धोकादायकरीत्या प्रवास करत असल्याचे चित्र या भागात सध्या दिसून येत आहे.

प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

नंदुरबार : जिल्ह्यात पावसाळ्यातील निसर्ग साैंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक सातपुड्यात भेटी देतात. यंदाही पर्यटक या भागात भेटी देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर धबधबे तसेच पर्यटकांची गर्दी होणाऱ्या ठिकाणी पोलीस गस्त तसेच उपाययोजना करण्याची मागणी आहे. पाण्याच्या ठिकाणांवर खासकरून लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाची भीती असली तरीही पर्यटनस्थळे गजबजत आहेत.

कारागीर परतले

नंदुरबार : लाॅकडाऊनमध्ये बंद असलेला हाॅटेल व्यवसाय पुन्हा सुरू झाला आहे. यामुळे या उद्योगावर आधारित रोजगारही वेगात सुरू झाला आहे. कोरोनामुळे गावी परत गेलेले कारागीरही परत आले आहेत. यातून हाॅटेल व्यवसाय पुन्हा फुलू लागले असल्याचे दिसून आले असून, गर्दीही वाढत आहे.

अवैध व्यवसाय सुरूच

नंदुरबार : शहरातील कोरीट नाका परिसरात अवैध मद्य विक्रीचे व्यवसाय सुरू असल्याचे दिसून आले आहे. काशिबा गुरव चाैक ते गुरुकुल चाैफुलीदरम्यान गावठी दारू विक्री हाेत असल्याचे सातत्याने सांगण्यात येत आहे. याठिकाणी पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी आहे.

बाजारात टोमॅटोंची सुरू झाली घसरण

नंदुरबार : पावसाळा सुरू झाल्यानंतर भाजीपाला दरांमध्ये घसरण होते. यात सर्वाधिक नुकसान हे टोमॅटाे उत्पादकांचे होते. यंदा पावसाळ्याच्या प्रारंभीच टोमॅटाे २० रुपये किलोपर्यंत येऊन ठेपला आहे. येत्या काळात आवक वाढणार असल्याने दर कमी होणार आहेत.

धुळे मार्गावर बसेस वाढीची अपेक्षा

नंदुरबार : धुळे मार्गावर बसेस वाढीची अपेक्षा करण्यात येत आहे. मार्गावर प्रवाशांची मोठी संख्या आहे. यातून नंदुरबार ते धुळे आणि धुळे ते नंदुरबार अशा प्रत्येक फेरीत प्रवासी असतात. बसेस कमी असल्याने अनेकांना दुसऱ्या बससाठी थांबून राहावे लागत आहे.

Web Title: Even after the rains, there are no colonial roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.