विरोधाला न जुमानता अतिक्रमणे जमीनदोस्त
By Admin | Updated: November 20, 2014 13:46 IST2014-11-20T13:46:34+5:302014-11-20T13:46:34+5:30
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेस बुधवारी गालबोट लागलेच. युवकांच्या जमावाला हटविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

विरोधाला न जुमानता अतिक्रमणे जमीनदोस्त
नवापूर : शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेस बुधवारी गालबोट लागलेच. युवकांच्या जमावाला हटविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान, बुधवारी दिवसभरात ३५ पक्की व कच्ची अतिक्रमणे काढण्यात आली. गुरुवारीही ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
एक दिवसाच्या विश्रांतीनंतर शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम धडाक्यात सुरू करण्यात आली. जुन्या आरटीओ कार्यालयाजवळील बहुचर्चित अतिक्रमण मोठय़ा पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आले. जुन्या आरटीओ कार्यालयाजवळील अतिक्रमण शहरात राबविण्यात येणार्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या केंद्रस्थानी होते. १८ नोव्हेंबरपर्यंत अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिली होती. १८रोजी त्यावर सुनावणी होऊन जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती हटविल्याने या ठिकाणी मोठय़ा बंदोबस्तासह अतिक्रमण हटाव पथक ११वाजता हजर झाले. तहसीलदार संदीप भोसले, पालिका मुख्याधिकारी प्रतिभा पाटील, बांधकाम अभियंता गणेश गावीत सकाळपासूनच उपस्थित होते. अग्निशमन वाहनावर उभे राहून गणेश गावीत यांनी राजकीय पक्षाचा फलक तेथून हलविला. त्यानंतर राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा काढण्यात आल्या. दुपारी १२ वाजता पक्के अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. नव्या बांधकामासह गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या दोन गाळ्यांचे बांधकामही जमीनदोस्त करण्यात आले. हे सर्व होत असताना युवकांनी जोरदार घोषणा देत अतिक्रमण स्वत:हून काढून घेण्याची विनंती केली. त्यांचा प्रतिकारही सुरू होता. या प्रतिकारास न जुमानता प्रशासनाने ते अतिक्रमण पाडले. ही मोहीम अध्र्यावर आली असता पुन्हा युवक एकत्रित झाल्याने पोलिसांनी त्यांना लाठीचा चमत्कार दाखवून पळवून सोडले. याचवेळी जमावाला आवर घालताना व पोलिसांच्या लाठय़ा त्यांच्यामध्ये एकमेकांवर पडल्याने पोलीस उपनिरीक्षक संजय लोखंडे, गोविंद गढरी किरकोळ जखमी झालेत. पोलीस हवालदार अशोक बच्छाव, हवालदार दिनेश इंदवे व वसंत नागमल हेदेखील किरकोळ जखमी झाले. अशा स्थितीतही या पाचही अधिकारी-कर्मचार्यांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपले कर्तव्य पार पाडले.
दुपारी इस्मालपुरा भागात अतिक्रमण हटाव पथकाने आपला मोर्चा वळविला. नाल्यावर बांधलेली सहा घरे या ठिकाणी भुईसपाट करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावरून शहरात प्रवेश होत असलेल्या ठिकाणी विद्युत कार्यालयाजवळ चार दुकाने पाडण्यात आली. या ठिकाणी पथक व नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. पथकाने दुपारनंतर आपला मोर्चा बसस्थानक परिसरात वळविला. पालिकेच्या पदपथावर बांधलेले ओटे, छप्पर, लोखंडी पायर्या आदी काढण्यात आल्या. एका व्यापार्याने या भागात अधिकार्यांशी हुज्जत घातली. १७रोजी याच परिसरात तोडण्यात आलेले एक बांधकाम आज पुन्हा तोडण्यात आले. हे बांधकाम शहरवासीयांच्या सहानुभूतीच्या केंद्रस्थानी आले आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या व्यापारी संकुलाकडे हा मोर्चा वळला. कोणतीही पूर्व सूचना न देता व बाजार समिती तथा पालिकेच्या विहित हद्दीत असलेली ही बांधकामे असल्याने संकुलातील व्यापार्यांनी पथकाकडून चूक होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तोवर एका दुकानाचे शेड पाडण्यात आले होते. बसस्थानकासमोर एका झेरॉक्सच्या दुकानातही असाच प्रकार घडला. व्यापारी संकुलातील व्यावसायिकांनी एकत्रितपणे विरोध केल्याने पथक मागे फिरले. सायंकाळी पाच वाजेअखेर पथकाकडून ३५ अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आली. यात राजकीय पदाधिकारी, मातब्बर यांचा समावेश होता.
पाच युवकांना अटक
अतिक्रमण हटवताना काही युवकांनी घोषणा देत विरोध केला होता. त्यामुळे सौम्य लाठीमारही झाला. परिणामी मोहिमेला गालबोट लागले. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली पाच युवकांना अटक करण्यात आली. सायंकाळी त्यांची सुटका करण्यात आली. दरम्यान, यापुढेही ही मोहीम सुरूच राहणार आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्ताचे नव्याने नियोजन करून बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे. (वार्ताहर)
मोठय़ा पोलीस बंदोबस्तात शरात अतिक्रमण हटाव मोहिमेंतर्गत पालिकेने अतिक्रमण काढले आहे. अशा बंदोबस्तात यापुढे अतिक्रमण काढण्याचे थांबणार असले तरी स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने ही मोहीम जारी राहणार. कायद्याचा अंमल केवळ प्रशासनाचे काम नसून ते नागरिकांचे कर्तव्यही आहे.नागरिकांनी कायद्याचे उल्लंघन करून प्रशासनास कटू कारवाई करण्यास भाग पाडू नये.प्रशासन व नागरिक यांच्यात अपेक्षित असलेले सौजन्याचे नाते जोपासण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. -प्रतिभा पाटील, मुख्याधिकारी, नवापूर पालिका
■ उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप बाविस्कर यांच्यासह पोलीस निरीक्षक उत्तमराव शेळके, चार पोलीस निरीक्षक, १0 पोलीस उपनिरीक्षक, १८0 पोलीस कर्मचारी व सुरक्षा बल पथक यांचा बंदोबस्त उभारण्यात आला होता. प्रत्येक ठिकाणी नागरिकांची होत असलेली गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात येत होता.
■ जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ असलेले अतिक्रमण काढण्यासाठी १७ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले संदीप रजनीकांत पारेख यांनी आपले उपोषण सायंकाळी सहा वाजता मागे घेतले. अधिकार्यांच्या उपस्थितीत त्यांनी हे उपोषण सोडले.