खरीप हंगामासाठी सोयाबीनच्या स्वउत्पादित बियाण्यांवर भर : कृषी विभागाचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:29 IST2021-04-18T04:29:43+5:302021-04-18T04:29:43+5:30
जिल्ह्यात मागील हंगामात सोयाबीन पीक काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने काही प्रमाणात सोयाबीन बियाणे भिजलेले आहे. त्यामुळे त्याच्या उगवण क्षमतेवर ...

खरीप हंगामासाठी सोयाबीनच्या स्वउत्पादित बियाण्यांवर भर : कृषी विभागाचे आवाहन
जिल्ह्यात मागील हंगामात सोयाबीन पीक काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने काही प्रमाणात सोयाबीन बियाणे भिजलेले आहे. त्यामुळे त्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोयाबीन बियाणाच्या बाजारभावात वाढ झाल्याने शेतकरी हे बियाणे विकण्याची शक्यता नाकारता येत नाही. बियाणे उत्पादक कंपन्यांकडून बियाणांचे दर मागील वर्षापेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी वाळलेल्या बियाण्यातील शेंगा फोलपटे, काडीकचरा, माती, खडे बाजूला काढून स्वच्छ केलेले बियाणे नवीन गोणपाटात भरून ठेवावे. सोयाबीन बियाणे हवेतील आर्द्रता शोषून घेत असल्याने साठवणुकीचे ठिकाण थंड, ओलावाविरहित व हवेशीर असावे. साठवणुकीच्या पोत्याची उंची ७ फुटांपेक्षा अधिक असणार नाही, याची दक्षता घ्यावी. बियाणे १०० किलोच्या पोत्यात भरलेले असल्यास चार पोत्यांपेक्षा जास्त उंची व ४० किलोच्या पोत्यात भरलेले असल्यास आठ पोत्यांपेक्षा अधिक थप्पी लावे नये; अन्यथा खालच्या पोत्यातील बियाण्यावर वजन पडून बियाणे फुटण्याची व उगवण शक्ती कमी होण्याची शक्यता असते.
पोत्याची रचना उभ्या- आडव्या पद्धतीने असावी. असे केल्यास हवा खेळती राहून उगवण शक्ती टिकून राहण्यास मदत होते. आवश्यकतेनुसार बियाणे साठवलेल्या खोलीत कीटकनाशके व बुरशीनाशकाचा उपयोग करावा. पोत्याची हाताळणी व वाहतूक काळजीपूर्वक करावी. अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांनी केले आहे.