लसीकरणाबाबत ग्रामीण भागातील गैरसमज दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:30 IST2021-07-31T04:30:43+5:302021-07-31T04:30:43+5:30
जयनगर : तीन ते चार महिन्यापासून देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची शिबिरे प्रत्येक गावोगावी सुरू करण्यात आली होती. मात्र, आता ...

लसीकरणाबाबत ग्रामीण भागातील गैरसमज दूर
जयनगर : तीन ते चार महिन्यापासून देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची शिबिरे प्रत्येक गावोगावी सुरू करण्यात आली होती. मात्र, आता लसींच्या तुटवड्यामुळे मोजक्याच गावांमध्ये लसीकरण शिबिर होत आहेत. आता लसीकरणाबाबत लोकांमधील जाणीव - जागृतीमुळे गैरसमज दूर झाले असून, १८ ते ४४ वयोगटातील तरुणांना जयनगर येथे पहिल्या डोसची प्रतीक्षा आहे. ४५ वर्षाच्या पुढील व्यक्तींनी पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
शहादा तालुक्यातील जयनगर येथे मे महिन्यात लसीकरणाची शिबिरे घेण्यात आली होती. त्यावेळी ४५ वर्षापुढील ज्या व्यक्तींनी पहिला डोस घेतला होता त्यांना आता दुसऱ्या डोससाठी वडाळी अथवा काहाटूळ येथे जावे लागत आहे. जयनगर येथे बरेच दिवस झाले तरी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे शिबिर होत नाही. त्यामुळे जयनगर येथील ४५ वर्षापुढील सर्वच लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. मात्र, दुसरा डोससाठी लोकांना दुसऱ्या गावातील शिबिरांवर अवलंबून राहावे लागत आहे.
राज्य शासनातर्फे तसेच आरोग्य विभाग, स्थानिक पातळीवरील शिक्षक, समाजसेवी संस्था यांच्याकडून कोरोना लसीकरण जनजागृतीसाठी प्रत्येक गावांमध्ये युद्धपातळीवर प्रयत्न झाले होते. या जनजागृतीचा परिणाम सगळ्या लोकांमध्ये झाला असून, आता सर्वच लोकं लसीकरणासाठी इच्छुक आहेत. मात्र, सध्या कासवगतीने होत असलेल्या लसीकरणामुळे अनेक गावांमधील लोकांचा लसीकरणाचा पहिला व दुसऱ्या डोसचा कालावधी होऊनही त्यांना दुसरा डोस भेटत नाही. ज्या व्यक्तींचे लसीकरण बाकी आहे, त्यांचे लवकरात - लवकर लसीकरण करण्याची गरज आहे. कारण तिसऱ्या लाटेचा लहान बालकांना मोठ्या प्रमाणावर संसर्गाचा धोका होण्याची शक्यता अधिक आहे. म्हणून वेळीच लोकांचे लसीकरण केले नाही तर त्यांचा धोका कुटुंबासह इतर व्यक्तींनाही होणार आहे.