निवडणुका बदलताच राजकारणाचे समीकरणेही बदलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 12:53 IST2019-12-25T12:53:23+5:302019-12-25T12:53:29+5:30
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या आठ महिन्यात लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्या. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका ...

निवडणुका बदलताच राजकारणाचे समीकरणेही बदलली
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या आठ महिन्यात लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्या. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू असून या तिन्ही निवडणुकांत जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणे तीनवेळा बदलताना जिल्ह्यातील जनतेला अनुभव येत आहे. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांच्या पक्ष बदल इतका गुंतागुंतीचा झाला की दुसऱ्या फळीचे कार्यकर्ते कुठल्या पक्षात आहेत हे जाणकार नेत्यांनाही ओळखणे अवघड झाले आहे.
गेल्या तीन-चार दशकांत राजकारणातील अनेक स्थित्यंतरे लोकांनी अनुभवले असले तरी गेल्या आठ महिन्यात राजकीय पक्षांमध्ये कार्यकर्त्यांचे जे स्थित्यंतर झाले ते खरोखरच जुन्या पिढीतील लोकांसाठी धक्कादायक असेच आहे. नंदुरबार जिल्ह्यातील गेल्या आठ महिन्यातील राजकीय चित्र पाहता लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे वेगळी होती. काँग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होती. त्यात भाजपने लाखापेक्षा अधिक मतांनी निवडणूक जिंकली असली तरी दोन्ही पक्षातील चुरस मोठी होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र राजकारण वेगळेच पहायला मिळाले. अनेक कार्यकर्ते व नेत्यांनी पक्ष बदल केल्याने राजकीय समीकरणे बदलली. अर्थात नेते आणि कार्यकर्त्यांच्या दलबदल झाले असले तरी निकाल मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच काँग्रेस आणि भाजपसाठी समसमान राहिला. पण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम दिसणार आहे. नेत्यांच्या पक्ष बदलामुळे जिल्ह्यातील सत्तेचेही केंद्रीकरण झाले. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यावर पकड असलेला नेता आज दिसून येत नाही. चंद्रकांत रघुवंशी यांनी काँग्रेस सोडल्यामुळे काँग्रेसची पूर्ण जिल्ह्यावरील पकड राहिली नाही. दुसरीकडे रघुवंशी यांनी जरी शिवसेनेत प्रवेश केला तरी शिवसेनेचा जिल्ह्यातील सर्वच भागात प्रभाव नसल्याने त्याचाही परिणाम राजकारणावर दिसून येतो. डॉ.विजयकुमार गावीत यांचे काँग्रेस आणि भाजपमध्ये सरळ लढत असताना संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचा वैयक्तिक प्रभाव होता. परंतु विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये देखील गटातटाचे राजकारण मोठ्या प्रमाणावर झाल्याने त्यांच्या नेतृत्वाला देखील मर्यादा आल्या आहेत.
अशा स्थितीत आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा दुसºया फळीतील कार्यकर्त्यांनी उमेदवारी मिळविण्यासाठी किंवा इतर पक्षांतर्गत वादामुळे पक्षांतर केले आहे. त्यात विशेषत: जि.प.चे माजी सदस्य अभिजित पाटील यांचा समावेश आहे. ते गेल्या जि.प.च्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे विजयी झाले होते. त्यानंतर मात्र त्यांचा जिल्ह्यातील राजकारणात भाजप जवळ सोयरीक राहिली. त्यांचे वडील मोतीलाल पाटील हे शहाद्याचे नगराध्यक्ष झाल्यानंतर भाजपची सूत्रे त्यांच्याचकडे होती. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचा सक्रीय प्रचार केला. आता मात्र त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. केवळ त्यांनीच नव्हे तर त्यांच्या अनेक समर्थक कार्यकर्त्यांनीही काँग्रेसतर्फे उमेदवारी भरली आहे. अशा अनेक कार्यकर्त्यांनी दलबदल केल्यामुळे कोण कुठल्या पक्षातर्फे निवडणूक लढवीत आहे हे चेहºयावरुन ओळखणे राजकारणा-तील जाणका-रांनाही अवघड झाले आहे. या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना आणि राष्टÑवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी होईल, अशी काही कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. परंतु त्यासाठी कुणीही फारसा पुढाकार न घेतल्याने शिवाय नेत्यांचेही अंतर्गत सोयीच्या राजकारणाची भूमिका असल्याने ती आघाडी होऊ शकली नाही. भाजपने सर्वच ठिकाणी उमेदवार दिले आहेत. त्यामुळे या वेळी बहुतांश गटात तिरंगी आणि चौरंगी लढती पहायला मिळणार आहेत.
एकूणच या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कुठल्याही एका पक्षाची सत्ता येईल, असे चित्र आज तरी नाही. नेत्यांनाही त्याबाबत खात्री असल्याने निवडणुकीच्या निकालानंतरच आघाडी आणि गट-तट जोडणीचे राजकारण करण्याची नेत्यांची भूमिका असल्याचे चित्र आहे.