आठ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:29 IST2021-04-13T04:29:01+5:302021-04-13T04:29:01+5:30

शहादा : शहरासह तालुक्यात कोरोना विषाणू संक्रमणाचा विळखा वाढत असला तरी तालुक्यातील १८० गावांपैकी आठ गावांमध्ये गेल्या मार्चपासून एकही ...

Eight villages stopped Corona at the gate! | आठ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले !

आठ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले !

शहादा : शहरासह तालुक्यात कोरोना विषाणू संक्रमणाचा विळखा वाढत असला तरी तालुक्यातील १८० गावांपैकी आठ गावांमध्ये गेल्या मार्चपासून एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. या गावांनी अद्यापर्यंत कोरोनाला वेशीबाहेर रोखण्याची किमया साधली आहे, तर ८० गावांमध्ये आजच्या स्थितीत एकही बाधित नाही. ७५ गावांमध्ये बाधितांची संख्या ही दहाच्या आत आहे.

देशात कोरोना संक्रमणाचे संकट उद्भवल्यानंतर १८ मार्च २०२० पासून जून महिन्यापर्यंत करण्यात आले होते. असे असताना शहादा शहरात २२ एप्रिल २०२०ला कोरोनाचा पहिला बाधित रुग्ण आढळून आला. त्यानंतर अवघ्या महिनाभराच्या कालावधीत शहरासह ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढली. कोरोना विषाणूचे संक्रमण थोपविण्यासाठी लॉकडाऊनच्या कालावधीत सोशल डिस्टन्सिंग पाळणे, गावात औषध फवारणी करणे, आदी उपाययोजना पालिका व ग्रामपंचायत स्तरावर करण्यात आल्या.

तालुक्यात १४७ ग्रामपंचायती अंतर्गत १८० गावांचा समावेश आहे. यापैकी गेल्या मार्च महिन्यापासून तालुक्यातील आठ गावांच्या कारभाऱ्यांनी कोरोना विषाणूला वेशीबाहेर रोखण्यात यश मिळविले आहे. गेल्या १४ महिन्यांच्या कालावधीत शासकीय नियमांचे पालन करून गावातील पदाधिकाऱ्यांनी सामंजस्याने कोरोना विषाणूची बाधा गावकऱ्यांनी या आठ गावांत पसरू दिली नाही. वेळोवेळी औषध फवारणी करण्यासह आरोग्य विभागामार्फत गावकऱ्यांची तपासणी करून इतर ठिकाणांहून गावात आलेल्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना गावात परवानगी दिली जात असल्याने या आठही गावांत कोरोनाचा एकही रुग्ण अद्यापपर्यंत आढळून आलेला नाही.

जानेवारी २०२१ पासून शहरासह तालुक्यात कोरोना विषाणूचे संक्रमण वाढले. अनेक गावांमध्ये बाधित मोठ्या संख्येने आढळून आले. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. आता तालुक्यातील ८० गावं अशी आहेत, तिथे २० मार्चनंतर नव्याने बाधित रुग्ण आढळून आला नाही. परिणामी या गावांमध्ये बाधितांची संख्या शून्य आहे. मध्यंतरीच्या कालावधीत बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर या गावात विशेष उपाययोजना ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात आल्याने या गावांमध्ये सध्यातरी कोरोनाचे संक्रमण नाही.

शहरासह तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण असले तरी तालुक्यातील ७५ गावांमध्ये अगदी बोटावर मोजता येतील एवढे बाधित रुग्ण सद्य:स्थितीत आहेत. या गावांमध्ये दहापेक्षा कमी बाधित रुग्ण आहेत. पैकी बरेच रुग्ण उपचाराअंती बरे होण्याच्या मार्गावर आहेत.

Web Title: Eight villages stopped Corona at the gate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.