विसरवाडीत आठ हजार कोंबड्या नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:47 IST2021-02-23T04:47:56+5:302021-02-23T04:47:56+5:30

विसरवाडी/नवापूर : शहरातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन संपल्यानंतर बर्ड फ्लूची लागण नवापूर तालुक्यातील विसरवाडी ग्रामीण भागात झाली ...

Eight thousand hens destroyed in Visarwadi | विसरवाडीत आठ हजार कोंबड्या नष्ट

विसरवाडीत आठ हजार कोंबड्या नष्ट

विसरवाडी/नवापूर : शहरातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन संपल्यानंतर बर्ड फ्लूची लागण नवापूर तालुक्यातील विसरवाडी ग्रामीण भागात झाली आहे.

विसरवाडी येथील जावेद पोल्ट्रीचा बर्ड फ्लूचा अहवाल भोपाल प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा रविवारी पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दुपारी पशुसंवर्धनाचे २५ पथक पाठवून किलिंग ऑपरेशनला प्रत्यक्ष सुुरुवात केली आहे.

जावेद पोल्ट्री फॉर्ममध्ये एकूण आठ हजार ३०८ कुक्कुट पक्षी असून, ४० हजार ४२० अंडी आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील १२ पथकाच्या माध्यमातून किलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. उर्वरित दोन पोल्ट्रीमधील १२ हजार ५८६ कोंबडीचे किलिंग ऑपरेशन उद्या सोमवारी सकाळी राबविण्यात येणार आहे.

जावेद पोल्ट्री फार्मपासून एक किलोमीटर परिसर बाधित क्षेत्र म्हणून प्रशासन घोषित करणार आहे, अशी माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली. या परिसरात बंगलावाला व जावेद अश्या दोन पोल्ट्री फार्म आहेत. या दोन्ही पोल्ट्रीत साधारण १० हजार कुकुट पक्षी आहे. या पोल्ट्रीत पक्ष्यांची मरतूक नसल्याने तेथील पक्षांचे अहवाल तपासणीसाठी भोपाल प्रयोगशाळेत पाठवण्यात आले नाही. विसरवाडी परिसरामध्ये बर्ड फ्लू नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जात आहे. एक किलोमीटर परिसरातील चिकन व अंडी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

नवापूर परिसरातील एकूण २२ पोल्ट्रीतील पाच लाख ७८ हजार कुक्कुट पक्षी व २५ लाख अंडी नष्ट करण्यात आली आहेत तर उर्वरित पाच ते सहा पोल्ट्रीत लाखो पक्षी व अंडी आहेत. तेथील अहवाल तीन वेळा निगेटिव्ह आल्याने येथील कुक्कुट पक्ष्यांचे कलिंग ऑपरेशन करण्यात आले नाही.

नुकसान भरपाई लवकर मिळावी

नवापूर परिसरातील २२ पोल्ट्री फार्ममधील किलिंग ऑपरेशन संपल्यानंतर प्रशासनाने पशुसंवर्धन विभागाच्या पथकामार्फत पोल्ट्री व्यावसायिकांना पोल्ट्रीतील कुकुट पक्षी विष्टा, पशुखाद्य गोदाम निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश दिल्याने पशुसंवर्धन विभाग व पोल्ट्री व्यावसायिकांनी पोल्ट्री निर्जंतुकीकरणासाठी सुरुवात केली आहे. नवापूर परिसरातील पोल्ट्री व्यावसायिक लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाकडे सारखा तगादा लावत आहे. शासनाने लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पोल्ट्री व्यावसायिकांनी केली आहे.

बर्ड फ्लू होऊ नये याकडे लक्ष द्यावे

नवापूर शहरात राज्यातील सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन करण्यात आले. या दरम्यान लाखो पक्षी व लाखो अंडी नष्ट करण्यात आलेली आहे. नवापूर परिसरातील पाच ते सहा पोल्ट्रींचा अहवाल निगेटिव्ह आल्याने तेथे लाखो पक्षी व अंडी आहेत. बर्ड फ्लूची लागण होऊ नये. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नवापूर परिसरातील चार-पाच लाख कुकुट पक्षी सुरक्षित आहेत. या संदर्भामध्ये पशुसंवर्धन विभाग व महसूल विभागाने पोल्ट्री व्यावसायिकांची बैठक घेऊन बर्ड फ्लू संदर्भात उपायोजनाच्या सूचना केल्या आहेत.

गुजरात सीमावर्ती भागात विशेष काळजी घ्यावी

गुजरात राज्यातील उच्छल परिसरातील नॅशनल पोल्ट्रीत बर्ड फ्लूचा धोकेदायक एच ५ एन १ विषाणूचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नवापूर परिसरातील आजूबाजूच्या पोल्ट्री व्यवसायिकांची धडकी भरली आहे. पोल्ट्रीतील १७ हजार कुकुट पक्षी गुजरात राज्यातील पशुसंवर्धन विभागाने नष्ट केली आहे. तरीदेखील परिसरात उपाययोजना केल्याने पक्षांना त्याची लागण होणार नाही याकडे व्यावसायिकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अश्या सूचना पशुसंवर्धन विभागाचा अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

Web Title: Eight thousand hens destroyed in Visarwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.