कोरोना काळात रोहयो अंतर्गत १६ हजार मजुरांना मिळाले काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 12:24 IST2020-05-08T12:23:50+5:302020-05-08T12:24:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोविड-१९ च्या संकटात ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रशासनातर्फे विशेष मोहिम हाती घेण्यात ...

कोरोना काळात रोहयो अंतर्गत १६ हजार मजुरांना मिळाले काम
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोविड-१९ च्या संकटात ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रशासनातर्फे विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून १६ हजार ७२५ मजूरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मनरेगा अंतर्गत शेल्फवर ३२ हजार कामे ठेवण्यात आली असून ३१ हजार अपूर्ण कामे उपलब्ध आहेत.
जॉबकार्ड असलेल्या व्यक्तीने कामाची मागणी करताच त्याला रोजगार उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. एकूण ३६३ ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू करण्यात आली आहेत. अक्कलकुवा तालुक्यात ३,७३६, अक्राणी ३,१३०, नंदुरबार १,९७७, नवापूर ३,१६०, शहादा २,७४२ आणि तळोदा तालुक्यात १,९८० मजूर कामावर आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आणि मास्क घालून कामे करण्यात येत आहेत. पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी दुर्गम भागातील आदिवासी मजूरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्तरावर प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत. मजूर संख्येच्या बाबतीत जिल्हा राज्यात सहाव्या क्रमांकावर असून ४० हजार मजूरांना रोजगार उपलब्ध करून देत जिल्ह्याला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत. मजूरांना एका दिवसासाठी २३८ रुपये मजूरी देण्यात येत आहे. जिल्ह्यात मस्टर संपल्यानंतर आठ दिवसाच्या आत १०० टक्के मजूरांच्या खात्यावर मजूरीची रक्कम थेट जमा करण्यात येते. आतापर्यंत दीड कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. योजनेविषयी आणि उपलब्ध कामाविषयी माहिती देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कामांचे संनियंत्रण आणि येणाºया अडचणी दूर करण्यासाठी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. कृषी विभागातर्फे ७३, वन विभागातर्फे ९३, सामाजिक वनीकरण विभागातर्फे २३ आणि ग्रामपंचायत स्तरावर ३,४२४ कामे सुरू आहेत. जलसंधारण, जलसंपदा, वन, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतदेखील कामे सुरू करण्यात येत आहेत.