विक्रेत्यांच्या आडमुठेपणामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:38 IST2021-04-30T04:38:57+5:302021-04-30T04:38:57+5:30
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी यानी १५ एप्रिल ते १ मे या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानावर बंदी ...

विक्रेत्यांच्या आडमुठेपणामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी यानी १५ एप्रिल ते १ मे या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानावर बंदी आहे. यादरम्यान भाजीपाला व फळ विक्रेत्यांसाठी पालिकेकडून नियोजनही करण्यात आले असून या विक्रेत्यांना चिनोदा रोडवरील कचरा डेपोसमोरील मोकळ्या जागेत दुकान लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. लॉकडाऊन काळात भाजीपाला व फळविक्रेत्यांनी याच जागेवर आपली दुकाने लावण्याचे बंधनकारक होते, असे प्रशासनाच्या वतीने आवाहनही करण्यात आले होते. परंतु प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता या विक्रेत्यांनी जुन्या जागेवरच म्हणजे स्मारक चौक, भन्साली प्लाझा,ब सस्थानक रोड या ठिकाणीच आपली दुकाने लावली होती. एवढेच नाही तर भन्साली प्लाझाच्या आजूबाजूच्या परिसरात व बसस्थानक रस्त्यावर वाहतुकीला अळथळा ठरेल अशा मधोमध जागेवर लावली होती. त्यामुळे अशा मुजोर फळविक्रेत्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करणे आवश्यक आहे.
विक्रेत्यांच्या या आडमुठेपणामुळे या ठिकाणी गर्दी व सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडलेला दिसून आला . शासनाच्या वतीने कोरोनाच्या ‘ब्रेक द चेन’ला ब्रेक कसा मिळेल? अशा प्रश्न उपस्थित होत आहे.
आठवड्यातून सोमवार ते शुक्रवार या काळात सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू असतात. तर शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यूचे पालन करण्यात येते. सर्व काही सुरळीत सुरू असतानाही फळविक्रेत्यांची अशी मनमानी न समजणारी आहे. सर्वसामान्य ग्राहक फळे व भाजीपाला खरेदीसाठी कचरा डेपो समोरील पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या जागेवर विना तक्रार जात आहेत. तरीही या विक्रेत्यांचा उतावीळपणा धोकादायक आहे. यादरम्यान प्रशासनाला विक्रेत्यांनी बंदी असलेल्या जागेवर दुकाने लावल्याची बाब लक्षात आल्यावर प्रशासनाच्या वतीने अधिकारी या विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी गेले असता या विक्रेत्यांनी आपल्या हातगाड्यांसह तेथून पळ काढला. त्यामुळे प्रशासनाला कारवाई करता आली नाही.