रोषमाळ खुर्द येथील पाणीपातळी खोल गेल्यामुळे नागरिकांना करावी लागतेय भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:32 IST2021-03-23T04:32:26+5:302021-03-23T04:32:26+5:30

तळोदा : धडगाव तालुक्यातील रोषमाळ खुर्द गावात पाणी अत्यंत खोलवर गेल्यामुळे तेथील रहिवाशांना आटत चाललेल्या विहिरीचा आसरा घ्यावा लागत ...

Due to deep water level in Roshmal Khurd, citizens have to wander | रोषमाळ खुर्द येथील पाणीपातळी खोल गेल्यामुळे नागरिकांना करावी लागतेय भटकंती

रोषमाळ खुर्द येथील पाणीपातळी खोल गेल्यामुळे नागरिकांना करावी लागतेय भटकंती

तळोदा : धडगाव तालुक्यातील रोषमाळ खुर्द गावात पाणी अत्यंत खोलवर गेल्यामुळे तेथील रहिवाशांना आटत चाललेल्या विहिरीचा आसरा घ्यावा लागत आहे. येथील नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने मुख्यमंत्री पेयजल योजनेतून या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

धडगाव तालुक्यातील रोषमाळ खुर्द ही ग्रुप ग्रामपंचायत असून, या ग्रामपंचायतीला तब्बल २५ पाडे जोडली आहेत. गावाची लोकसंख्या साधारण एक हजार ३०० आहे. गावात हातपंपासाठी ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी कूपनलिका केल्या असल्या तरी येथील पाण्याची पातळी अत्यंत खोलवर गेली असल्यामुळे गावकऱ्यांना एकाच गाव विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. तीही आता आटण्याचा मार्गावर असल्यामुळे तेथून हंडाभर पाणी आणण्यासाठी गावकऱ्यांना अक्षरशः मोठी गर्दी करावी लागत असते. याशिवाय पाण्यासाठी आजूबाजूच्या ठिकाणी भटकंती करावी लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच पाण्यासाठी पूर्ण दिवसदेखील खर्च करावा लागत असल्याचेही ग्रामस्थ सांगतात. ग्रामपंचायतीने आता पुन्हा दोन बोअर केल्या होत्या. त्याही ४०० फूट केल्या होत्या. त्यावेळेस पाणी लागले होते; परंतु आता तेही आटले आहे. त्यामुळे रोषमाळ वासीयांना पाण्यासाठी दमछाक करावी लागत आहे. वास्तविक येथील पाण्याची पातळी प्रचंड खोलवर गेल्यामुळे येथे पुन्हा बोअर करणे अशक्य आहे. त्यामुळे प्रशासनाने मुख्यमंत्री पेयजल योजनेचा विचार करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

आश्रमशाळेमध्ये देखील पाण्याची समस्या

या गावातच आदिवासी विकास विभागाची शासकीय आश्रमशाळा आहे. येथील मुलांनादेखील पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मुलांनादेखील गावातील विहिरींचा आसरा घ्यावा लागत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. याबाबत पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांना निवेदनसुद्धा देण्यात आले आहे. त्या निवेदनात म्हटले आहे की, येथील आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. शाळेत विद्यार्थीही उपस्थित आहेत. शाळेत विद्यार्थ्यांसाठी पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे तेही गावातील सार्वजनिक विहिरींचा वापर करत असतात. मात्र, तेथेच प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनादेखील पाण्यासाठी ताटकळत राहावे लागत असते. आपल्या स्तरावर या शाळेत कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाबूलाल पावरा यांनी केली आहे. दरम्यान, शाळेतील पाण्याच्या समस्येबाबत प्रकल्पातील एका अधिकाऱ्यास विचारले असता दोन कूपनलिका करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले.

रोषमाळ खुर्द गावात पाण्याची पातळी तब्बल ४०० फुटांवर गेली आहे. तरीही दोन बोअर केल्या होत्या. मात्र, त्याचाही उपयोग झाला नाही. सार्वजनिक विहीरदेखील आहे. तरीही मुख्यमंत्री पेयजल योजनेतून प्रस्ताव सादर करायचा आहे. - बी. एस. पवार, ग्रामसेवक, ग्रामपंचायत, रोषमाळ खुर्द, ता. धडगाव

Web Title: Due to deep water level in Roshmal Khurd, citizens have to wander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.