कोरोनामुळे स्कूल बसचालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर, १४ महिन्यांपासून काम नाही; रोजंदारीचे कामही भेटेनासे झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST2021-05-25T04:34:07+5:302021-05-25T04:34:07+5:30
कोरोना महामारीमुळे शासनाने संचारबंदी लावल्यामुळे याचा परिणाम छोटे-मोठे व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणात झाला. परंतु मुलांना शाळेत शिकण्यासाठी घेऊन जाणारे ...

कोरोनामुळे स्कूल बसचालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर, १४ महिन्यांपासून काम नाही; रोजंदारीचे कामही भेटेनासे झाले
कोरोना महामारीमुळे शासनाने संचारबंदी लावल्यामुळे याचा परिणाम छोटे-मोठे व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणात झाला. परंतु मुलांना शाळेत शिकण्यासाठी घेऊन जाणारे स्कूल बसचे सारथी काम नसल्यामुळे सध्या घरीच असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शेतीमध्ये सध्या मशागतीची कामे चालू असल्याने मोलमजुरीवर पोट भरणारे बसचालक सध्या काम नसल्यामुळे दोनवेळच्या जेवणाची चिंता करताना दिसून येत आहे. मुलांना शाळेत आणि शाळेतून घरी आणणारे बसचालक १४ महिन्यांपासून बस घरी उभीच असल्यामुळे स्वतःच्या संसाराची बस कशी चालवायची? असा प्रश्न या चालकांना पडला आहे. दुसरीकडे संचारबंदीमुळे किराणा मालाचे भाव खूपच वाढले आहेत, म्हणून पोट भरण्यासाठी अनेक बसचालक घर बांधकामावर, शेतात ट्रॅक्टर चालवायला जात आहेत. मात्र जे बसचालक शेतात मजुरी करून उदरनिर्वाह चालवित होते ते सध्या शेतातील भुईमूग काढणी, ऊस, केळी, पपई लागवड आटोपल्यामुळे घरीच आहेत. आता पावसाळा सुरू झाल्याशिवाय त्यांच्या हाताला काम मिळणार नाही.
अनेक तरुणांनी नोकरी भेटत नसल्यामुळे बँकेचे कर्ज काढून स्कूल बस खरेदी केली आहे. गरजेनुसार त्यांनी अनेक शाळांवर मुले घेऊन जाण्याचे काम करायला सुरुवात केली होती. पालकांनीही सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्या पाल्यांसाठी स्कूल बस लावलेली होती. त्यामुळे अनेक तरुणांना रोजगार मिळाला होता. मात्र मागीलवर्षी कोरोनामुळे संचारबंदी लागली. संसर्ग वाढत गेल्याने बाजार, दुकाने अनेकदा बंद ठेवण्याची वेळ आली. मध्यंतरी रुग्ण संख्या कमी झाल्यावर दोन-अडीच महिने शाळा सुरू झाल्या. मात्र दुसऱ्या लाटेचा प्रसार जलद गतीने वाढल्यामुळे पुन्हा शाळा सरसकट बंद झाल्या. पुन्हा शाळेच्या गाडीबरोबर बसचालकांच्या उदरनिर्वाहाची गाडी बंद झाली. परिणामी बसचालकांवर पुन्हा उपासमारीची वेळ येऊन ठेपली.
शाळा बंद झाल्यामुळे मुले घरी बसून ऑनलाइन शिक्षण घेत होते. शिक्षण थांबले नाही, मात्र बसची चाके थांबल्याने बँकेच्या हप्त्याने घेतलेल्या गाडीचे हप्ते थांबले. गाडीचे हप्त्यांचे व्याजदर वाढत आहे. शाळा बंद झाल्या तरी लग्नासाठी, पर्यटनासाठी किंवा इतर कार्यक्रम ठिकाणी आपली गाडी चालेल, असे बस चालकांना वाटत होते. मात्र सार्वजनिक वाहतूकही शासनाने बंद केल्याने स्कूल बसेसची चाके रुतली आहेत.
स्कूल बस बंद असल्याने मिळेल ते काम करून बसचालक उदरनिर्वाह करीत होते. मात्र सध्या मजुरीचे काम मिळेल याची शाश्वती नाही. म्हणून शासनाने या स्कूल बस चालकांकडेही लक्ष देऊन काहीतरी आर्थिक सहाय्य करावे, अशा प्रतिक्रिया बसचालकांकडून व्यक्त होत आहेत.
१४ महिन्यांपासून वाहन बंद असल्याने हातांना काम नाही, म्हणून मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. सध्या शेतातही काम नसल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे.
-कमलाकर कोळी, स्कूल बसचालक, कोठली, ता.शहादा