कोरोनामुळे जिल्ह्यात यंदा केवळ ९७ टक्केच महसूली करांची झाली वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:21 IST2021-06-18T04:21:43+5:302021-06-18T04:21:43+5:30

नंदुरबार : कोरोनामुळे फेब्रुवारीपासूनच जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे. बाधितांची संख्या वाढण्यासोबतच मृत्यूची संख्याही दुपटीने वाढली आहे. यातून जिल्ह्यात चिंता ...

Due to Corona, only 97% revenue tax was collected in the district this year | कोरोनामुळे जिल्ह्यात यंदा केवळ ९७ टक्केच महसूली करांची झाली वसुली

कोरोनामुळे जिल्ह्यात यंदा केवळ ९७ टक्केच महसूली करांची झाली वसुली

नंदुरबार : कोरोनामुळे फेब्रुवारीपासूनच जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे. बाधितांची संख्या वाढण्यासोबतच मृत्यूची संख्याही दुपटीने वाढली आहे. यातून जिल्ह्यात चिंता निर्माण होऊन प्रशासनाच्या इतर विभागांवर त्यांचा परिणाम झाल्याचे आता समोर येत आहे. यात प्रामुख्याने महसुली वसुलीचा समावेश असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महसूल वसुली केवळ ९७ टक्केच झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात साधारण १८ प्रकारच्या विविध करांची वार्षिक वसुली ३६ महसूल मंडलात नियुक्त करण्यात आलेल्या तलाठ्यांकडून ३१ मार्चअखेर करण्यात येते. यात गौण खनिज, रोजगार हमी, घरपट्टी, पाणीपट्टी, मनोरंजन, शिक्षण, जमीन महसूल, शेतसारा, मत्स्य, कोर्ट फी, मुद्रांक, बीडीडीआर, नोंदणीपत्र, जाहिरात, जमीन महसूल, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती , सेस, इजीएस, अकृषक, सिटी सर्वे, वस्तीवाढ व नझूल यांचा समावेश आहे. २०१९ - २०२० या वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर शासनाने दिलेले ३८ कोटी ९९ लाख रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही, अशी शक्यता होती. परंतु, याउलट महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मार्च अखेरीस जिल्ह्यात ४४ कोटी १२ लाख ६० हजार रुपयांची वसुली केली होती. उद्दिष्टापेक्षा १६ टक्के अर्थात ११६. ०९ टक्के वसुली जिल्ह्यातून करण्यात आली होती.

जिल्ह्यातून गेल्या वर्षात वसुलीमुळे शासनाकडून २०२० - २१ या आर्थिक वर्षासाठी नंदुरबार जिल्ह्याला ५८ कोटी ४२ लाख रुपयांचे उद्दिष्ट मिळाले होते. परंतु, मार्च २०२१ अखेरीस केवळ ५६ कोटी ६७ लाख ९१ हजार रुपयांची वसुली जिल्ह्याला करता आली आहे. केवळ ९७ टक्के वसुली झाल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत जिल्हा यंदा मागे असल्याचे दिसून आले आहे. विशेष बाब म्हणजे फेब्रुवारी ते मार्च २०२० या काळात कोरोना सोबत लढण्याची तयारी सुरू असतानाही महसूल विभागाने १०० टक्क्यांपेक्षा अधिक वसुली केली होती. परंतु, यंदा मात्र कोरोनामुळे कर्मचारी बाहेर पडू न शकल्याने वसुली कमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

जिल्ह्यात एकूण १ लाख ९९ हजार ४९६ खातेदार शेतकरी आहेत. त्यांच्याकडून जमीन महसुलातून वसुली गेल्या चार वर्षात नियमित झाली आहे. अकृषक क्षेत्राची वसुली वाढली आहे. सन २०१६ - १८ मध्ये शासनाकडून जमीन महसूल व इतर करांपोटी २८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात येत होते. त्यातून जिल्ह्यात साधारणपणे १६ कोटी रुपयांची वसुली होत होती. परंतु गेल्या दोन वर्षात ही वसुली १०० टक्के करण्यावर भर देण्यात येत आहे.

जिल्ह्यातील शहादा आणि नंदुरबार या दोन मोठ्या तालुका व शहरी भागातून सर्वाधिक वसुली होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. नंदुरबार व शहादा तालुक्यातून सरासरी १० कोटी रुपयांची महसुली वसुली करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. यात दरवर्षी मालमत्तांमध्ये वाढ होत असल्याने करही वाढत आहे.

कोरोनामुळे जिल्ह्यातील जमीन - खरेदी विक्रीचे व्यवहार तसेच इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद आहेत. सिनेमागृहे व जमिनीसंदर्भातील बांधकामेही बंद पडली होती. यातून सुमारे ७० टक्के वसुलीवर परिणाम झाला होता. असे असतानाही महसूल विभागाचे तलाठी व मंडल अधिकारी यांनी इतर करांची वसुली वाढवून उद्दिष्टपूर्तीला हातभार लावला आहे.

शासनाचा सर्वाधिक महसूल हा मुद्रांक खरेदी व विक्रीतून येतो. परंतु घर आणि जमीन खरेदी विक्रीसह इतर व्यवहार हे गेल्या वर्षीपासून कमी झाले आहेत. लाॅकडाऊन काळात दुय्यम निबंधकांकडे दिवसातून एखाद दुसरा व्यवहार नोंद होत होता. यातून मार्च ते मे या काळात व्यवहारांची संख्या घटल्याने शासनाच्या महसुलावरही परिणाम झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या १६ दिवसांपासून या कार्यालयांमध्ये गजबज वाढली असून, खरेदी - विक्रीचे व्यवहार पूर्ववत होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Web Title: Due to Corona, only 97% revenue tax was collected in the district this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.