खासदारांच्या तक्रारीमुळे रेमडेसिविर वाटप झाले बंद, रघुवंशी यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:27 IST2021-04-19T04:27:23+5:302021-04-19T04:27:23+5:30
नंदुरबार : रोटरी वेलनेस सेंटरतर्फे गरीब व गरजू रुग्णांना अत्यल्प दरात रेमडेसिविर वाटप झाले. परंतु खासदार डॉ. हिना गावीत ...

खासदारांच्या तक्रारीमुळे रेमडेसिविर वाटप झाले बंद, रघुवंशी यांचा आरोप
नंदुरबार : रोटरी वेलनेस सेंटरतर्फे गरीब व गरजू रुग्णांना अत्यल्प दरात रेमडेसिविर वाटप झाले. परंतु खासदार डॉ. हिना गावीत यांनी त्याची तक्रार करून ते वाटप बंद पाडल्याचा आरोप माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केला आहे. यामुळे अनेक गरजू रुग्णांची गैरसोय झाल्याचेही त्यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी म्हटले आहे की, रोटरी वेलनेस सेंटरने पाच हजार रेमडेसिविर इंजेक्शन्स विकत आणली होती. त्यातील एक हजार इंजेक्शन शासनाने उपलब्ध करून दिली. शासनाकडून घेतलेली एक हजार इंजेक्शन ही प्रत्येकी ५९४ रुपयांना विकत घेतले व रुग्णांना तेच इंजेक्शन अवघ्या ५५० रुपयांमध्ये दिले. मागील कालावधीत दीड हजार रुपयांना घेतलेले इंजेक्शन १२०० रुपयांना, १७०० रुपयांना घेतलेेले १५५० रुपयांना म्हणजेच सेवा म्हणून कमी भावात विकले, त्यात काय चूक केली, असा प्रश्न उपस्थित करून आपण काही करायचे नाही व जे कुणी काही करत असतील तर त्यांचा पाय ओढायचा, असा प्रयत्न खासदार डॉ. हिना गावीत यांनी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी पाच हजार, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी सात हजार, सुरतचे खासदार सी. आर. पाटील यांनी पाच हजार इंजेक्शन वाटप केले. परंतु आपल्या खासदारांनी एकही इंजेक्शन उपलब्ध करून दिले नाही. उलट ज्यांनी समाजसेवा म्हणून वाटप केले त्यांच्याबाबत तक्रारी करून ते बंद पाडल्याचा आरोपही या पत्रकात करण्यात आला आहे.
या राजकारणामुळे गरजू रुग्णांची गैरसोय करण्यात खासदारांनी मोलाचा वाटा उचलला असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.