पावसाची रिपरिप; आणखी पाच दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:32 IST2021-07-30T04:32:36+5:302021-07-30T04:32:36+5:30
जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात दमदार आणि पेरणीलायक पाऊसच झाला नव्हता. त्यामुळे ४० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरण्याच झालेल्या नव्हत्या तर यापूर्वी ...

पावसाची रिपरिप; आणखी पाच दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात दमदार आणि पेरणीलायक पाऊसच झाला नव्हता. त्यामुळे ४० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरण्याच झालेल्या नव्हत्या तर यापूर्वी पेरणी झालेल्या क्षेत्रातील पिके वाया जाण्याची भीती होती. आणखी आठ दिवस पाऊस आला नसता तर पिकं करपून वाया गेली असती. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे मात्र पिकं वाचली असून, उर्वरित क्षेत्रातदेखील पेरणी होण्यास आता मदत होणार आहे. अर्थात पावणेदोन महिने वाया गेले आहेत. आता जे पीक येईल त्यावर समाधान मानून उर्वरित क्षेत्रात पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाला आहे. पावसाने उघडीप दिल्यास आणि जमिनीत वाफसा निर्माण झाल्यास लागलीच पेरण्यांना सुरुवात होणार आहे.
गेल्या पाच दिवसांपासूनच्या पावसामुळे मात्र जिल्ह्यातील अनेक नदी-नाले प्रवाही होण्यास सुरुवात झाली आहे. पावसाची अशीच संततधार राहिल्यास जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठ्यातदेखील वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे निर्माण झालेले संकट दूर होण्याची आशा व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील पहाडी क्षेत्रात अधिक आहे. त्यामुळे डोंगर उतारावरून येणाऱ्या नाल्यांमुळे सपाटीवरील नद्या व नालेही प्रवाही होत आहेत.
दरम्यान, कृषी विज्ञान केंद्राच्या जिल्हा कृषी हवामान केंद्रातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार येत्या पाच दिवसात जिल्ह्यातील सर्वच भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शेतजमिनीत योग्य वाफसा झाल्यानंतरच पेरणी करावी, असाही सल्ला या केंद्रातर्फे देण्यात आला आहे.