पाण्याच्या गुणवत्तेवर निर्माण होतेय शंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 12:54 IST2019-05-18T12:54:21+5:302019-05-18T12:54:42+5:30
नंदुरबार : जिल्हातील १३४ जिल्हा परिषद शाळांमध्ये बसविण्यात आलेल्या वॉटर प्युरिफायरच्या देखभाल दुुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची बाब उघड ...

पाण्याच्या गुणवत्तेवर निर्माण होतेय शंका
नंदुरबार : जिल्हातील १३४ जिल्हा परिषद शाळांमध्ये बसविण्यात आलेल्या वॉटर प्युरिफायरच्या देखभाल दुुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची बाब उघड झाली आहे़ पावसाळा जवळ असताना अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळले जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे़ विशेष म्हणजे ग्रामपंचायत विभाग व शिक्षण विभाग यांच्यात देखभाल दुरुस्तीबाबत संभ्रमावस्था आहे़
सन २०११-२०१२ दरम्यान, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ३८६ शाळांपैकी १३४ शाळांमध्ये वॉटर प्युरिफायर बसविण्यात आले होते़ परंतु देखभाल दुरुस्तीअभावी यातील अनेक वॉटर प्युरिफायर काम करीत नसल्याची माहिती आहे़ देखभाल दुरुस्तीचा खर्च विशेष फंडातून मिळत असला तरीही संबंधित प्रशासनाच्या मनमानी व ढिसाळ कारभारामुळे वॉटर प्युरिफायरच्या देखभाल दुुरुस्तीचे काम टाळण्यात येत असते़ त्यामुळे हा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ असल्याच्या भावना जनसामान्यातून व्यक्त करण्यात येत आहेत़ पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे नमुन्यांची तपासणी करणे महत्वाचे आहे़ विद्यार्थ्यांवरचे ओझे कमी व्हावे, त्यांना घरुन पाणी न आणता शाळेमध्येच शुध्द पाणी मिळावे म्हणून ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत शाळेतील पाण्याच्या स्त्रोतांना वॉटर प्युरिफायर बसविण्याची योजना अंमलात आणण्यात आली होती़ त्यानंतर अनेक वर्षांनी या वॉटर प्लॅन्टमधून शुध्द पाणी येतेय की नाही? हे तपासणी करण्याचे आदेश शासनाकडून वेळोवेळी देण्यात आले आहे़ उन्हाळी सुट्या संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु होण्याच्या आत वॉटर प्युरीफायरमध्ये काही तृटी असल्यास उपाय योजना करणे गरजेचे आहे़ परंतु याबाबत माहितीची जुळवा-जुळव करण्यातच शिक्षण विभागाचा वेळ जात असल्याने पुढील कार्यवाही होणार कधी असा प्रश्न पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे़ शिक्षण विभागाने जास्त वेळ न घालवता लवकरात लवकर शाळांमध्ये बसविण्यात आलेल्या सर्व वॉटर प्युरिफायरचे नमूने तपासून वॉटर प्युरिफायरमधून येणारे पाणी शुध्द आहे किंवा नाही तसेच प्युरिफायर सुस्थितीत आहे किंवा नाही, याची पडताळणी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे़ शाळांमध्ये बसविण्यात आलेल्या वॉटर प्युरिफायरची पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे़ पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दुुषित पाण्याची समस्या निर्माण होत असते़ ग्रामीण भागात यात अधिकच भर पडत असते़ जनगणनेसोबतच इरतही अनेक शासकीय कामे थर्ड पार्टी कंपनीला लावून करण्याचे नवे फॅड सध्या प्रसिध्द आहे़ त्यामुळे पाण्याचे नमुने गोळा करणे आणि त्याची तपासणी करण्यासाठीही अशी व्यवस्था होणे गरजेचे आहे़