विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 11:56 IST2020-06-19T11:53:49+5:302020-06-19T11:56:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ग्रामिण भागात शाळा सुरू करायच्या असतील तर शिक्षकांना मुख्यालयी अर्थात गावातच थांबण्याची सक्ती करावी. ...

Don't play with students' souls | विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ग्रामिण भागात शाळा सुरू करायच्या असतील तर शिक्षकांना मुख्यालयी अर्थात गावातच थांबण्याची सक्ती करावी. मुलांच्या सुरक्षीततेसाठी शहरी भागातून त्यांना ये-जा करू देवू नये अशी मागणी जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत करण्यात आली. दरम्यान, शाळा सुरू होण्याच्या ७ दिवस आधी शिक्षकांना गावातच राहण्याची सक्ती करण्यात येईल अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली.
नंदुरबार जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपाध्यक्ष अ‍ॅड.राम रघुवंशी, सभापती अभिजीत पाटील, रतन पाडवी, जयश्री पाटील, निर्मला राऊत आदी उपस्थित होते. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत शाळा सुरू करण्याचा विषय उपस्थित करण्यात आला. जिल्ह्यातील ग्रामिण भागात कोरोनाचा फैलाव नाही. शाळा सुरू केल्यास शहरी भागातून ये-जा करणाऱ्या शिक्षकांमुळे मुुलांना धोका निर्माण होऊ शकतो. विशेषत: नंदुरबारात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा ठिकाणाहून शिक्षक ये-जा करीत असतील तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षीततेचे काय? असा प्रश्न देवमन पवार यांनी उपस्थित केला. त्यामुळे कोरोना काळात शिक्षकांना मुख्यालयी थांबण्याची सक्ती करावी अशी मागणी सदस्य देवमन पवार यांच्यासह भरत गावीत यांनी केली. शिक्षक मुख्यालयी राहत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. आता शाळा बंद आहेत. शिक्षक मुख्यालयी राहीले असते तर विद्यार्थ्यांना घरोघरी जावून अभ्यास देता आला असता, त्यांच्याकडून त्यांच्या वर्गाच्या अभ्यासक्रमाची तयारी करून घेता आली असती अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली. किती शिक्षक मुख्यालयी राहतात अशी विचारणा देखील यावेळी करण्यात आली.
यावर मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले, शिक्षकांनी मुख्यालयीच राहावे असे आदेश पूर्वीपासूनच आहेत. परंतु अनेक शिक्षक मुख्यालयी राहत असल्याचा ग्रामपंचायतीचा दाखला आणत असतात. त्यामुळे कारवाई करता येत नसल्याचे स्पष्ट केले. त्यावर पवार आणि गावीत यांनी अशा दाखल्यांची चौकशी करावी, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी यांना संबधीत ठिकाणी भेटी देण्यास सांगून चौकशी करावी अशी मागणी केली. जर सदस्यांनी साथ दिली तर हा विषय मुळापासून निकाली काढू त्यासाठी सर्वांची साथ आवश्यक असल्याचे सीईओ गौडा यांनी सांगितले.
शासनाने शाळा सुरू करण्याचे आदेश दिल्यास शाळा सुरू होण्याच्या ७ दिवस आधी संबधीत शाळेतील शिक्षकांना त्याच गावात थांबण्याची सक्ती करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे आरोग्य, त्यांचा जीव महत्त्वाचा असल्याचेही गौडा यांनी स्पष्ट केले. अध्यक्षा सीमा वळवी व सर्व पदाधिकारी यांनीही याला दुजोरा देत नियोजन करण्याच्या सुचना दिल्या.
पुढील निधीत सर्वांना कामे
गेल्या सर्वसाधारण सभेत कामे वाटपावरून मोठा गदारोळ झाला होता. त्यामुळे सभा अर्ध्यातूनच आटोपावी लागली होती. तो विषय आजच्या सभेतही निघाला.
यावेळी मात्र सदस्यांची भावना सामंजस्याची होती. १२ कोटीच्या निधीतून विशिष्ट भागातच कामे दिली गेली. त्यामुळे यापुढील निधीतून सर्व भागात समान कामांचे वाटप करण्यात येईल. अजून तर आपल्या कारकिर्दीचे हे पहिलेच वर्ष आहे. त्यामुळे चार वर्षात भरपूर निधी येईल आणि भरपूर कामे दिली जातील असे अध्यक्षा सीमा वळवी यांनी सांगितले. बांधकाम सभापती अभिजीत पाटील यांनी देखील यापुढे कामांचे नियोजन सर्व मिळूनच केले जाईल असे सांगितले.
बैठकीत इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. धनराज पाटील, अर्चना गावीत, मधुकर नाईक, विजय पराडके यांनीही चर्चेत सहभाग घेतला.


कोरोनाच्या काळात मजुरांना स्थानिक स्तरावर काम मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे मंजुर आहेत. परंतु तारापूर, ता.नवापूर येथे जेसीबी मशिनने कामे केल्याची तक्रार मधुकर नाईक यांनी केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना कामाच्या ठिकाणी जावून चौकशी करण्याचे आदेश दिले.

Web Title: Don't play with students' souls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.