रेल्वेने दुसऱ्या राज्यात जाताय का ? आधी कोरोना चाचणी करून घ्या..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST2021-07-08T04:21:13+5:302021-07-08T04:21:13+5:30
नंदुरबार : पश्चिम रेल्वेच्या उधना-जळगाव रेल्वेमार्गावर प्रवासी रेल्वे गाड्या धावू लागल्या आहेत. यातून प्रवासीही मोठ्या संख्येने प्रवास ...

रेल्वेने दुसऱ्या राज्यात जाताय का ? आधी कोरोना चाचणी करून घ्या..!
नंदुरबार : पश्चिम रेल्वेच्या उधना-जळगाव रेल्वेमार्गावर प्रवासी रेल्वे गाड्या धावू लागल्या आहेत. यातून प्रवासीही मोठ्या संख्येने प्रवास करीत आहेत; मात्र रेल्वेने दुसऱ्या राज्यात जाण्यापूर्वी आरटीपीसीआर टेस्ट किंवा कोरोनाची लस घेण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशांचे प्रवाशांकडून स्वागत करण्यात आले आहे.
गुजरात राज्यात जाणे व येण्यासाठी नंदुरबार हे महत्त्वाचे स्थानक आहे. यामुळे याठिकाणी प्रवाशांची यापूर्वीही नियमित तपासणी केली जात होती. आता त्यात टेस्ट आणि लसीकरणाची सक्ती करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून नंदुरबार रेल्वेस्थानकावर गेल्या एक वर्षापासून पथक तैनात करुन प्रवाशांची तपासणी होत आहे. परंतु यापुढे रॅपिड टेस्ट आणि लसीकरण केंद्रही रेल्वे स्थानकात सुरु करण्याची आवश्यकता असून याचा प्रवाशांना लाभ होणार आहे.
सर्वच गाड्यांना थांबा देण्याची गरज
पश्चिम रेल्वेच्या उधना-जळगाव मार्गावर आठवड्यातून ४२ पेक्षा अधिक प्रवासी गाड्या धावतात. सध्या नंदुरबार आणि नवापूर या दोन ठिकाणी गाड्यांना थांबे आहेत. यातून इतर रेल्वेस्थानकावरील प्रवाशांचे हाल होत असल्याने तात्पुरत्या स्वरुपात छोट्या स्थानकांवर रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी आहे.
महाराष्ट्रातून गुजरात अथवा दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी आरटीपीसीआर टेस्ट किंवा कोरोनाची लस घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात रेल्वेने येणाऱ्या काही राज्यातील प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट सक्तीची केली आहे. त्यामुळे प्रवाशांनी टेस्टचा रिपोर्ट आणि लसीकरणाचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे गरजेचे आहे.
वाराणसीकडे जाणाऱ्या रेल्वेंना आरक्षण मिळेना
या भागात उत्तर प्रदेश, बिहारकडील अनेक मजूर रोजगारासाठी येत असतात. ते ताप्तीगंगा एक्स्प्रेसने बिहार अथवा वाराणसीकडे जातात. ताप्तीगंगाला आरक्षण मिळत नाही.
तीच स्थिती अहमदाबाद-चेन्नई एक्स्प्रेसचीही आहे. या भागातील अनेक भाविक तिरुपती येथे बालाजीच्या दर्शनाला जात असतात. सध्या मंदिर बंद आहे; मात्र इतर वेळी या नवजीवन एक्स्प्रेसचेही आरक्षण प्रवाशांना सहजासहजी मिळत नसते.
पॅसेंजर कधी सुरू होणार?
सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावरील काही पॅसेंजर गाड्या सुरू झालेल्या आहेत; मात्र एकच पॅसेंजर सुरू होणे बाकी आहे.
पॅसेंजरने तिकीट कमी लागत असते. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी पॅसेंजरने प्रवास करण्यास सर्वाधिक प्राधान्य देत असतो.
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
n चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्स्प्रेस
n अहमदाबाद हावडा एक्स्प्रेस
n अजमेर-पुरी एक्स्प्रेस
n वाराणसी-सुरत ताप्तीगंगा एक्स्प्रेस
n अहमदाबाद-बरेली एक्स्प्रेस