कुणी रेमडेसिवीर देता का...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:32 IST2021-04-09T04:32:30+5:302021-04-09T04:32:30+5:30
कोरोना या संसर्गजन्य आजाराची सध्या दुसरी लाट आली आहे. आरोग्य प्रशासनाने चाचण्यांची संख्या वाढविल्याने रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. कुटुंबातील ...

कुणी रेमडेसिवीर देता का...?
कोरोना या संसर्गजन्य आजाराची सध्या दुसरी लाट आली आहे. आरोग्य प्रशासनाने चाचण्यांची संख्या वाढविल्याने रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. कुटुंबातील एकाला लागण झाल्याने संपर्कातील निदान दोन-तीन जण तरी पॉझिटिव्ह येत आहेत. कोरोना संसर्गजन्य आजार असून त्याचा झपाट्याने प्रसार होत आहे. सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांत उपचार करूनही रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढल्याने चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचारासाठी खाजगी दवाखान्यात भरती होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पर्यायाने शहरातील कोविड सेंटरसह खाजगी दवाखान्यात मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होत आहेत. कोरोनावर उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन इम्युनिटी वाढीच्या दृष्टीने प्रभावी ठरत असल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना पेशंट ॲडमिट करण्यापूर्वीच रेमडेसिवीरची व्यवस्था करण्याची सूचना हॉस्पिटलकडून केली जात आहे. या इंजेक्शनचा मेडिकल स्टोअर्सवर तुटवडा असून काही ठिकाणी एमआरपी व त्यापेक्षा अधिक किंमतीत इंजेक्शन विकले जात आहे. सामाजिक संस्थांमार्फत माफक दरात इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र कंपन्यांकडूनही इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना ‘कुणी रेमडेसिवीर देता का?' रेमडेसिवीर...’ अशी आर्त विनवणी करीत फिरावे लागत आहे.
दरम्यान, जिल्हा आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन जिल्ह्यातील सरकारीसह खाजगी रुग्णालयात दाखल कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन वेळेवर व पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
तीन दिवसात ३७ पेक्षा अधिक जणांचा मृत्यू
शहादा शहरात १५ पेक्षा अधिक तर ग्रामीण भागात २२ पेक्षा अधिक नागरिकांचे गेल्या तीन दिवसात विविध कारणांनी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यात ४० ते ५० वयोगटातील मध्यमवयाच्या नागरिकांसह सेवानिवृत्तांचाही यात समावेश आहे. तीन दिवसात शहरासह परिसरात विविध कारणांनी मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याने जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या निधन वार्तांनी मन सुन्न होत आहे.
शहादा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात परिस्थितीने भयावह रूप धारण केले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने सक्षम पावले उचलणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे शहरात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाने अनेक कोविड सेंटरला मान्यता दिली आहे. या सेंटरकडे रेमडीसीवर इंजेक्शनचा स्वतंत्र कोटा असतो. असे असतानाही या कोविड सेंटर चालकांकडून पेशंटला ॲडमिट करण्याअगोदरच पेशंटच्या नातेवाईकाला रेमडीसीवर इंजेक्शन असेल तरच आम्ही ॲडमिट करू, असा सल्ला दिला जात आहे. सध्याची परिस्थिती पाहता यावर गांभीर्याने विचार करुन प्रयत्न झाले नाही तर येत्या काही दिवसात मोठे दुष्परिणाम सहन करावे लागतील, अशी शंका तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.