जिल्हा झाला तुर्त कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 12:19 IST2020-05-19T12:19:51+5:302020-05-19T12:19:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात उपचार घेणारे कोरोनाचे दोन रुग्ण देखील सोमवारी कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना सायंकाळी ...

The district was immediately coronated | जिल्हा झाला तुर्त कोरोनामुक्त

जिल्हा झाला तुर्त कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात उपचार घेणारे कोरोनाचे दोन रुग्ण देखील सोमवारी कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना सायंकाळी जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील सर्वच १९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने सद्य स्थितीत जिल्ह्यात एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह नाहीत. १७ एप्रिल ते ८ मे दरम्यान जिल्ह्यात २१ रुग्ण आढळून आले होते त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला होता.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण १७ एप्रिल रोजी आढळून आला होता. नंदुरबारातील अलीसाहब मोहल्ला भागातील या रुग्णाच्या संपर्कातील इतर तीन रुग्ण देखील पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर शहादा व अक्लककुवा येथे रुग्ण आढळून आले होते. एकुण रुग्णसंख्या २१ झाली होती. त्यातील शहादा येथील पहिला रुग्णचा मृत्यू दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसात झाला होता. तर नंदुरबार येथील वृद्धेचा मृत्यू आजाराच्या शेवटच्या टप्प्यात झाला होता.
शेवटचे दोन रुग्ण
जिल्हा रुग्णालयाच्या आयशोलेशन कक्षात गेल्या दोन आठवड्यांपासून दोन रुग्ण उपचार घेत होते. त्यात नटावद येथील एकजण तर आष्टे येथील एका महिलेचा समावेश होता. या दोन्ही रुग्णांचे शेवटचे दोन अहवाल देखील निगेटिव्ह आल्याने त्यांना कोरोनामुक्त घोषीत करून त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे जिल्हा रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह असलेला आता एकही रुग्ण दाखल नसल्याचे चित्र आहे.
१,०६३ जणांचे स्वॅब
जिल्ह्यात पहिला रुग्ण १७ एप्रिल रोजी तर शेवटचा रुग्ण ८ मे रोजी आढळून आला होता. या कालावधीत या रुग्णांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींना ट्रेस करून त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्या व्यक्तींसह लक्षणे असलेल्या इतर अशा एकुण एक हजार ३८ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचे २१ वगळता सर्व नमुने हे निगेटिव्ह आले होते. याशिवाय ज्या रुग्णांना कोरोनासारखी प्राथमिक लक्षणे होती त्यातील काहींना जिल्हा रुग्णालयात आयशोलेशन कक्षा व्यतिरिक्त कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तीन दिवस त्यांच्यावरील उपचार आणि त्याला त्यांच्याकडून मिळणारा प्रतिसाद यानंतर अशा रुग्णांनाही डिस्चार्ज दिला जात होता. सद्य स्थितीत असे रुग्ण देखील केवळ चार असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
लॉकडाऊनचे पालन
२२ मार्च पासून आतापर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊनचीही प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. शहरी भागातील बाजारपेठचा परिसर आणि प्रतिबंधीत क्षेत्रात उपाययोजना केल्या गेल्याने गर्दीवर नियंत्रण देखील ठेवण्यात आले. परिणामी लोकांचा एकमेकांशी संपर्क येण्याचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण संख्येवर मर्यादा राहिली.
डॉक्टर असोसिएशनचे आवाहन
जिल्ह्यात सद्य स्थितीत एकही कोरोनाचा रुग्ण नसल्यामुळे जिल्हावासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी बेफिकीरपणा करून चालणार नाही. त्यामुळे प्रशासनातर्फे यापूर्वी सुरू असलेले निर्बंध, उपाययोजना कायम राहणार आहे. जिल्हा डॉक्टर असोसिएशनने देखील आवाहन केले आहे. येता काळ कसोटीचा आहे. जिल्हा बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आता जेही रुग्ण सापडत आहेत ते अशाच स्वरूपातील आहेत. त्यामुळे यापुढे अधीक दक्षता घ्यावी लागणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राजेश वळवी यांनी सांगितले.

दोघांना आज टाळ्यांच्या गजरात आणि फुलांची उधळण करीत घरी पाठविण्यात आले. दोघा रुग्णांच्या चेहºयावर आनंद दिसत होता. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांनीदेखील सर्व रुग्ण संसर्गमुक्त झाल्याने समाधान व्यक्त केले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत, उपजिल्हाधिकारी कैलास कडलग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.डी. भोये, डॉ. के.डी. सातपुते ,डॉ. पंकज चौधरी, अधिपरिचारिका नामी गावीत, पौर्णिमा भोसले, मंजुषा मावची, टिना वळवी, कक्षसेवक उदय परदेशी, अक्रम शेख उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्ण संसर्गमुक्त होणे ही जिल्ह्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि परिचारिकांचे मन:पूर्वक अभिनंदन. त्यांनी रुग्णांवर उपचार करण्याबरोबर त्यांचे मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न केले. जनतेचे चांगले सहकार्य लाभले. पोलीस, महसूल, ग्रामपंचायत, नगरपालिका अशा सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी उत्तमरितीने पार पाडली. आता यापुढेही नागरिकांनी दक्ष राहावे व कोरोनाचा पुन्हा जिल्ह्यात शिरकाव होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
-अ‍ॅड.के.सी.पाडवी, पालकमंत्री, नंदुरबार.

नागरिकांनी खबरदारी घ्यावी. शारिरीक अंतराच्या नियमाचे पालन करावे व अनावश्यक गर्दी टाळावी. शहरातील व्यवहार सुरळीत करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न असून नागरिकांनी त्यास सहकार्य करावे आणि या संकटापासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करणाºया सर्व कोरोना योद्ध्यांविषयी सन्मानाची भावना मनात बाळगावी. सामुहिक प्रयत्नांनी हे शक्य झाले आहे. त्यामुळे यापुढेही सर्वांनी काळजी घेणे आवश्यक राहणार आहे.
-डॉ.राजेंद्र भारूड, जिल्हाधिकारी, नंदुरबार.

Web Title: The district was immediately coronated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.