कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी जिल्हा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:39 IST2020-03-19T12:38:45+5:302020-03-19T12:39:01+5:30

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जगभरातील नागरिक सध्या कोरोनाने धास्तावले आहेत. अर्थातच त्याचे लोण महाराष्टÑातही आल्याने ...

District ready to face Corona | कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी जिल्हा सज्ज

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी जिल्हा सज्ज

रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जगभरातील नागरिक सध्या कोरोनाने धास्तावले आहेत. अर्थातच त्याचे लोण महाराष्टÑातही आल्याने गेल्या आठवड्या भरापासून महाराष्टÑ अलर्ट झाला आहे. प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. नंदुरबार जिल्ह्यातदेखील सर्वच खबरदारीचे उपाय होत असून, नागरिकांमध्येही या आजाराबाबत प्रचंड जनजागृती आली आहे. त्यामुळे कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी जिल्हा सज्ज झाला असला तरी नागरिकांमधील जागृत असूनही बेपर्वाईची वागणूक, संस्कृती, अध्यात्म आणि विविध कार्यक्रमानिमित्ताने होणारे गर्दीचे कार्यक्रम टाळणे आवश्यक आहे. विशेष करून प्रशासनानेही अजून खोलावर जावून दक्षता घेणे आवश्यक आहे. सध्या मुंबई-पुण्याकडून येणारे लोंढे चिंताजनक असून, त्याबाबतही सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक आहे.
साधारणत: अडीच दशकांपूर्वीची ही घटना आहे. १९९४ मध्ये सुरत शहरात प्लेगची साथ आली होती. त्या वेळी सुरत मधून खान्देशात येणाऱ्या नागरिकांची संख्या प्रचंड वाढली होती. रेल्वेतर प्रवाशांनी गच्च भरून अगदी टपावर प्रवासी बसून येत होते. त्या वेळी मात्र खान्देश प्रचंड धास्तावला होता. कारण येणाºया नागरिकांची संख्या इतकी प्रचंड होती की, प्रशासनही हतबल झाले होते. गुजरातमधून लोकांना आपापल्या गावी जा, असे आवाहन करून शहरातून काढले जात होते तर दुसरीकडे महाराष्टÑात लोक येवू नये याची काळजी घेतली जात होती. हा खेळ साधारणत: १५ दिवस सुरू होता. त्या वेळी प्लेगची साथ पसरू नये यासाठी नंदुरबारसह खान्देशात मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या गेल्या होत्या. नागरिकांमध्येही त्याबाबतची जागृती करण्यात आली होती. त्या वेळीदेखील जिल्ह्यातील जनतेने या साथीशी खंबीरपणे मुकाबला केला आणि एकही प्लेगचे रुग्ण जिल्ह्यात सापडले नाही किंवा कोणाला लागन झाली नाही. अर्थात २५ वर्षांपूर्वी संसाधनांची व तांत्रिक बाबींची मोठ्या प्रमाणावर कमतरता होती. त्याही स्थितीत तेव्हा जिल्ह्याने प्लेगशी मुकाबला केला. त्या तुलनेत आतामात्र साधणांची व तांत्रिक सुविधांची व्याप्ती वाढली आहे. प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्या असून, शाळा महाविद्यालयांना सुटी दिली आहे. गर्दी टाळण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. माध्यमातून सातत्याने जागृती केली जात असल्याने घराघरापर्यंत जागृतीचे संदेश पोहोचले आहेत. लोकही त्याचे अनुकरण करू लागले आहेत.
अर्थात लोकांना काय खबरदारी घ्यावी याबाबत माहिती झाली असली तरी त्याचे अनुकरणाबाबत अनेक जण बेपर्वाई करीत आहेत. खासकरून जिल्ह्यात संस्कृती आणि अध्यात्माचे उपासक लोकांची संख्या अधिक आहे. याशिवाय ग्रामीण लोक जीवन असल्याने एकमेकांच्या भावनेत गुरफटलेल्या समूहाचे येथे वास्तव्य आहे. त्यामुळे छोट्या छोट्या कार्यक्रमांनाही गर्दी होतांना दिसते. आदिवासी भागात काही ठिकाणी सोंगाड्या पार्र्टींचे कार्यक्रम सुरू आहेत. शहरी व ग्रामीण भागात लग्न समारंभही मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. काही ठिकाणी भागवत सप्ताहाचे कार्यक्रमही आहेत. मृत्यूच्या ठिकाणीदेखील शोक व्यक्त करण्यासाठी प्रचंड गर्दी होते. असे समाज जीवनातील अनेक छोटे-मोठे प्रसंग असतात. त्याठिकाणी गर्दी होत असते. या कार्यक्रमांना गर्दी टाळण्यासाठी काही दिवसतरी प्रेम आणि भावनेचा मोह आवरणे आवश्यक आहे. किंबहुना टाळता येणे कार्यक्रम रद्दच करणे गरजेचे आहे.
दुसरीकडे जिल्ह्यात विदेशातून आलेल्या नागरिकांची चाचणी घेण्यात आली असून, सर्वांचेच अहवाल निगेटीव्ह आल्याने समाधानाची बाब आहे. परंतु आता मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तेथून परतणाºया लोकांची संख्या प्रचंड आहे. खासकरून खाजगी ट्रॅव्हल्सने तिकिट दर वाढवूनदेखील फुल्ल भरुन येत आहेत. जाणाऱ्यांची संख्या नगन्य असली तरी येणाºयांची संख्या मात्र प्रचंड आहे. अर्थातच या भागातीलच अनेक जण नोकरी, व्यवसाय व शिक्षणाच्या निमित्ताने पुणे-मुंबईत असल्याने त्यांच्या नातेवाईकांनादेखील काळजी आहेच. त्यामुळे ते सुरक्षित राहावे ही काळजी सर्वांनाच असणे स्वाभाविक आहे. पण त्यासंदर्भात काही दक्षता पाळणेदेखील तेवढेच गरजेचे आहे. जे लोक परतत आहेत त्यांची कुठलीही नोंद अथवा तपासणी होत नसल्याने त्याबाबत आता प्रशासनाने व नागरिकांनीही सजगता बाळगणे आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. ही सर्वांसाठी आनंदाची बाब असली तरी पुढील किमान तीन आठवडे यासंदर्भात सर्वांनीच दक्षता घेणे गरजेचे आहे.

Web Title: District ready to face Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.