राज्यापेक्षा जिल्ह्याचा मृत्युदर अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST2021-05-29T04:23:43+5:302021-05-29T04:23:43+5:30
नंदुरबार : राज्याच्या मृत्युदरापेक्षा जिल्ह्याचा मृत्युदर तब्बल ०.४० टक्के अधिक आहे. जिल्ह्यात एकीकडे कोरोना रुग्ण कमी होत असताना दुसरीकडे ...

राज्यापेक्षा जिल्ह्याचा मृत्युदर अधिक
नंदुरबार : राज्याच्या मृत्युदरापेक्षा जिल्ह्याचा मृत्युदर तब्बल ०.४० टक्के अधिक आहे. जिल्ह्यात एकीकडे कोरोना रुग्ण कमी होत असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या कायम आहे. यामुळे एकीकडे दिलासा तर दुसरीकडे चिंता वाढली आहे. वाढत्या कोरोना मृत्युमुळे जिल्हा प्रशासनाचीही चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ घसरला आहे. दररोज १५ ते ३५ दरम्यान रुग्ण संख्या आढळून येत आहे. त्यामुळे अनेक खासगी कोरोना रुग्णालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जिल्हा रुग्णालयातदेखील रुग्ण संख्या कमालीची कमी झाली आहे. असे असले तरी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच राज्याच्या मृत्युदरापेक्षा जिल्ह्याचा मृत्युदर हा ०.४० टक्के आहे. राज्याचा मृत्युदर १.६२ असून नंदुरबार जिल्ह्याचा २.०२ इतका आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा दर स्थिर आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
दररोज आढळणारे रुग्ण व मृत्यू संख्या यातील तफावत अगदीच कमी राहत आहे. गुरुवार, २७ मे रोजी तर दिवसभरात १७ कोरोना रुग्ण आढळून आले असतांना सात जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती.
दरम्यान, जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू हे नंदुरबार तालुक्यात तब्बल ३४९ इतके झाले आहेत. त्या खालोखाल शहादा तालुक्यात १९५ जणांचा मृत्यू झाला आहे. नवापूर तालुक्यात १५६, तळोदा तालुक्यात ७६, अक्कलकुवा तालुक्यात २४ तर धडगाव तालुक्यात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हाबाहेरील ७८ जणांचा मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.