सूर्यग्रहणसाठी तीन हजार सौर चष्मे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 12:37 IST2019-12-26T12:37:20+5:302019-12-26T12:37:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : यंदा २६ डिसेंबर रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण होणार असून ते भारताच्या विविध भागातून दिसणार आहे. ...

सूर्यग्रहणसाठी तीन हजार सौर चष्मे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : यंदा २६ डिसेंबर रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण होणार असून ते भारताच्या विविध भागातून दिसणार आहे. यात साधारण ८५ टक्के सूर्याचा भाग झाकला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी अंनिसतर्फे जिल्ह्यात तीन हजार चष्मे वाटप करण्यात आले आहे.
वर्षभरात पृथ्वीच्या पाठीवरुन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन किंवा जास्तीत जास्त पाच सूर्यग्रहणे होतांना दिसून येतात. हे ग्रहण खग्रास, खंडग्रास व कंकणाकृती या तीन प्रकारांपैकी कोणतीही असू शकतात. त्यात यंदाचे ग्रहण हे कंकणाकृती आहेत. परंतु नंदुरबार जिल्ह्यात खंडग्रास स्थितीत दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजत सूर्यग्रहणाबाबत अंधश्रद्धा निर्माण होऊ नये, समाजातील अंधश्रद्धा दूर व्हावी यासाठी महाराष्ट्र अंनिसतर्फे राज्यभरात प्रबोधन मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत अंनिसतर्फे जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये तीन हजार सौर चष्मे उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सौर चष्म्याचा वापर करून विद्यार्थ्यांना सूर्यग्रहण पाहता येणार आहे. आज होणारे सूर्यग्रहण काही ठिकाणी कंकणाकृती तर काही ठिकाणी खंडग्रास स्वरूपामध्ये दिसणार आहे.आपल्या जिल्ह्यातही ते खंडग्रास स्वरूपामध्ये दिसणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सूर्यग्रहण लागण्याची वेळ सकाळी ८.०० असून सुटण्याची वेळ ११.३० आहे. जास्तीत जास्त खंडग्रास स्थितीची वेळ ९.३० राहणार आहे. खंडग्रास स्थितीमध्ये सूयार्चा जवळपास ८२ टक्के भाग झाकला जाणार आहे.
यंदाचे कंकणाकृती सूर्यग्रहण सकाळी ८ वाजेच्या सुमारास सुरू होणार असून डिसेंबर महिना हा थंडीचा महिना असल्याने या ग्रहणाचा खोगोलशास्त्राच्या अभ्यासकांसह अनेक नागरिक याचा आनंद घेणार आहे. हे ग्रहण पाहण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात काही संस्था, संघटनांमार्फत ग्रहण दर्शनाचा उपक्रम देखील अयोजित करण्यात आले आहे. यंदाचे कंकणाकृती सूर्यग्रहण दक्षिण भारतातून दिसणार असल्याने आपल्यासाठी एक पर्वणीच आहे.
डोळे हा आपल्या शरिराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे साध्या डोळ्यांनी सूर्यग्रहण न पाहता आवश्यक त्या साधनांचा वापर झाला पाहिजे. उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास अंधत्व किंवा डोळ्यांना गंभीर इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी डोळ्यांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ञांमार्फत म्हटले जात आहे. यासाठी विविध संस्थांमार्फत ग्रहण दर्शनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. ग्रहणासाठी सुरक्षेचे साधनेही यांच्याकडून देण्यात येणार आहे.