मे महिन्याचाही मुहूर्त टळल्याने उपवरांमध्ये नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:30 IST2021-05-14T04:30:17+5:302021-05-14T04:30:17+5:30
नंदुरबार : सुटीचा महिना म्हणून मे महिन्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर विवाह समारंभांचे आयोजन केले जात असते. गेल्या वर्षाप्रमाणे यंदा ...

मे महिन्याचाही मुहूर्त टळल्याने उपवरांमध्ये नाराजी
नंदुरबार : सुटीचा महिना म्हणून मे महिन्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर विवाह समारंभांचे आयोजन केले जात असते. गेल्या वर्षाप्रमाणे यंदा देखील मे महिना विवाह समारंभांविना गेल्याचे चित्र आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त देखील चुकला आहे. यामुळे मात्र मंगल कार्यालये, लॅान्स, मंडप, बॅण्ड यासह इतर अनेक व्यावसायिकांवर परिणाम झाला आहे.
विवाह समारंभांचा महिना म्हणून मे महिन्याकडे पाहिले जाते. दरवर्षी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी राहत असल्यामुळे अनेकांचा कल हा मे महिन्यातच समारंभ आयोजनाकडे असतो. परंतु दोन वर्षांपासून त्यावरही विरजण पडत आहे. यंदा देखील मे महिना विवाह समारंभांविनाच गेला आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त देखील टळला आहे. त्यामुळे सर्वच घटकांवर परिणाम झाला असून, अनेकांनी समारंभ पुढे ढकलण्यातच समाधान मानले आहे.
मंगल कार्यालयांचे गणित बिघडले
n गेल्या वर्षभरापासून मंगल कार्यालयांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. बॅंकांचे हप्ते थकले आहेत. किमान १०० जणांची परवानगी असती तर तेवढ्या लोकांचे पॅकेज घेऊन विवाह समारंभ आयोजित करता येत होते. परंतु केवळ २५ जणांची मर्यादा आहे. अनेक ठिकाणी तर मंगल कार्यालयात समारंभ आयोजित करण्यासह बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.
नियमांचा अडसर
लग्न समारंभ आयोजित करण्यासाठी शासनाने विविध नियम व अटी घालून दिलेल्या आहेत. केवळ २५ जणांच्या उपस्थितीत आयोजन करणे म्हणजे तारेवरची कसरत होते. बॅण्ड नाही, घोडा नाही, हळदी, मेहंदीचे कार्यक्रम नसल्यामुळे अनेक युवक, युवतींनी यंदा विवाहच न करण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे.