बिल वसुलीच्या नावाखाली कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:58 IST2021-02-21T04:58:37+5:302021-02-21T04:58:37+5:30

शहादा तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती होती. मागील वर्षी कोरोना महामारीमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला. परिणामी बाजारपेठा बंद ...

Disruption of power supply to agricultural pumps in the name of bill recovery | बिल वसुलीच्या नावाखाली कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित

बिल वसुलीच्या नावाखाली कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित

शहादा तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती होती. मागील वर्षी कोरोना महामारीमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला. परिणामी बाजारपेठा बंद होऊन आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागला. कोरोना काळात शेतकऱ्यांचे जगणे मुश्कील झाले होते. यंदाही अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला. मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन करून नुकसानीची भर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कृषीपंपांची थकीत वीज बिल वसुली मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेंतर्गत कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने पाण्याअभावी पिके करपू लागली आहेत. गहू, हरभरा, उन्हाळी भुईमूग, भाजीपाला यांसह ऊस, पपई व केळीला पाण्याची सद्यस्थितीत नितांत गरज आहे. मात्र, वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने पिकांना पाणी देता येत नाही. पिकांना वेळेवर पाणी मिळाले नाही तर उत्पन्नात मोठी घट येऊन शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. शेतकऱ्यांच्या हातात रब्बी हंगामातील उत्पन्न निघाल्यावरच पैसा येणार आहे. त्यामुळे ते सद्यस्थितीत वीज बिल भरू शकत नाहीत. त्यामुळे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या सर्व बाबींचा विचार करून ही मोहीम मागे घ्यावी व कृषीपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची अपेक्षा

कोरोनामुळे शेतकरी परेशान आहे. याचबरोबर दुष्काळात पाणी नाही, पाणी आहे तर वीजपुरवठा खंडित अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. वीज वितरण कंपनीकडून कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने बागायतदार शेतकरी अक्षरशः वैतागून गेले आहेत. या गंभीर प्रकाराकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

शहादा तालुक्यात वीज वितरण कंपनीचा अनागोंदी कारभार सुरू असून, किरकोळ दुरुस्तीसाठी दिवसभर वीजपुरवठा बंद केला जातो. अनेक ठिकाणचे ट्रान्स्फाॅर्मर नादुरुस्त आहेत. लोंबकळणाऱ्या वीज तारांमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन रात्रभर ग्रामस्थांना अंधारात रहावे लागते. या बाबींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे.

Web Title: Disruption of power supply to agricultural pumps in the name of bill recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.