कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांनी साडेपाच हजार नागरिक दगावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:31 IST2021-05-07T04:31:58+5:302021-05-07T04:31:58+5:30
नंदुरबार : कोरोनामुळे जिल्ह्यात साधारण ६०० जणांचा बळी गेला आहे. यातून जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर हा १.८ टक्के असल्याचे वारंवार ...

कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांनी साडेपाच हजार नागरिक दगावले
नंदुरबार : कोरोनामुळे जिल्ह्यात साधारण ६०० जणांचा बळी गेला आहे. यातून जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर हा १.८ टक्के असल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. परंतु त्यासोबत जिल्ह्यात इतर आजारांनी दगावणाऱ्यांची संख्याही कमी नसल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या वर्षात साडेपाच हजार जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये काेरोनाचा शिरकाव झाला होता. जुलै २०२० पर्यंत आटोक्यात असलेल्या कोरोनाने वेग पकडत ऑगस्ट महिन्यापासून मृत्यूची संख्या वाढण्यास सुरुवात झाली होती. यातून आजअखेरीस कोरोनामुळे ६३३ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही मृत्यूची ही मालिका सुरुच आहे. कोरोनाचा हाहाकार सुरू असताना विविध आजारांनी मृत होणाऱ्यांची संख्या मात्र मोठी असल्याचे दिसून आले असून वर्षभरात विविध आजारांनी ५ हजार ४९८ जणांचा जिल्ह्यात मृत्यू झाल्याच्या नोंदी आहेत.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अतिसारामुळे तीन, क्षयरोगामुळे ६८, श्वसनाच्या विकारांनी २९१, तापजन्य आजाराने ५६, एचआयव्ही २५, कॅन्सर २०६, मेंदूविकाराने १८५, अपघातांमध्ये २४९, आत्महत्या २०१, जनावरांनी चावा घेणे व दंशाने ४२, तीव्ररोगांमुळे ३९९, हृदयविकाराच्या धक्क्याने ८०९ तर जुनाट आजारांनी सर्वाधिक १ हजार ७२७ अशा ५ हजार ५५९८ जणांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षापासून आढावा घेतल्यास प्रत्येक महिन्यातील मृत्यूचा आकडा हा अधिक असल्याचे दिसून आले आहे. यात २०२० च्या एप्रिल महिन्यात ४२५, मे ३८६, जून ३६३, जुलै ४४२, ऑगस्ट ५०६, सप्टेंबर ५५९, ऑक्टोबर ५४०, नोव्हेंबर ५१५ तर डिसेंबर महिन्यात ४७५ जणांचा मृत्यू झाला आहे. चालू जानेवारी महिन्यात ४७५, फेब्रुवारी ४५२ तर मार्च महिन्यात ४९६ जणांचा विविध आजारांनी मृत्यू झाला आहे. अनैसर्गिक पद्धतीने झालेल्या या मृत्यूच्या नोंदी आरोग्य विभागाकडे करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.