लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : तालुक्याच्या दुर्गम भागातील वाडीखाडीपाडा येथील राऊत कुटूंबियांना विषबाधा होऊन दोघांचा करुण अंत झाल्याची घटना बुधवारी उजेडात आली होती़ यानंतर आरोग्य पथकाने याठिकाणी भेट दिली असता, एकाच शेतातून गावातील इतरही महिलांनी हरभऱ्याची भाजी तोडून आणली होती़ परंतू विषबाधा मात्र दमण्या राऊत यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांनाच झाल्याने या प्रकरणाचे गांभिर्य वाढले आहे़तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ स्वप्नील मालखेडे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य पथकाने गुरुवारी गावात सर्वेक्षण करुन तपासणी केल्या होत्या़ परंतू गावात कोणासही विषबाधा झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे़ यामुळे संबधित कुटूंबाला विषबाधा झाली कशामुळे हा प्रश्न उपस्थित होतो आहे़ मृत जयवंती आणि विपुल या दोघांचे शवविच्छेदन न करताच अंत्यविधीही पूर्ण झाले आहेत़ दरम्यान भाजपाचे प्रदेश सदस्य नागेश पाडवी यांनी बुधवारी ग्रामीण रुग्णालयात राऊत कुटूंबियांची भेट घेतली होती़ दुर्गम भागातील राऊत कुटंूबियाला न्याय मिळण्यासह शासनाने आर्थिक मदत देखील करावी अशी मागणी त्यांनी केली होती़प्रकरणाची अद्याप पोलीसातही नोंद नसून दमण्या राऊत, तुकाबाई व त्यांची चार मुले यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत़
विषबाधाप्रकरणाचा गुंता वाढल्याने चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 12:01 PM