संचारबंदी काळात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सवलत मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:28 IST2021-03-28T04:28:41+5:302021-03-28T04:28:41+5:30
शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उपाययोजनेचा भाग म्हणून शनिवार व रविवार दोन दिवस पूर्णत: संचारबंदीचे ...

संचारबंदी काळात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सवलत मिळणार
शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उपाययोजनेचा भाग म्हणून शनिवार व रविवार दोन दिवस पूर्णत: संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर लागलीच ३१ मार्चच्या मध्यरात्रीपासून १५ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत पूर्णत: संचारबंदीचे निर्देश दिले आहेत. यात अत्यावश्यक सुविधा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. दरम्यान, या काळात नागरिकांनी घाबरून न जाता घरीच राहणे पसंत करावे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी औषधांची दुकाने, रुग्णालये पूर्ण वेळ सुरू राहणार आहेत. दूध वितरकांना सकाळी सात ते नऊ व संध्याकाळी सहा ते आठ या वेळेस दूध वितरणास परवानगी राहणार आहे. तसेच किराणा आस्थापना सकाळी सहा ते ११ या वेळेत सुरू राहण्यास परवानगी राहणार असल्याने नागरिकांनी अतिरिक्त साठा घरात साठवू नये. बाजारात सामान अथवा वस्तू घेण्यासाठी गर्दी करू नये. आवश्यक तेवढाच सामान खरेदी करावा. कामानिमित्त घराबाहेर निघताना मास्क परिधान करावा, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा, दूध, भाजीपाला, किराणा आदी तत्सम वस्तूंचा घरपोच सेवेस प्राधान्य द्यावे, शहरातील काही दुकानदारांनी घरपोच सामान पोहोचविण्याची प्रक्रिया अमलात आणलेली आहे. बाजारात प्रत्यक्ष वस्तू खरेदी करण्यासाठी न जाता फोनवर अथवा संबंधित दुकानांशी संपर्क साधून घरपोच सामान मागविण्यास प्राधान्य द्यावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे.