महसुली दर्जाअभावी विकासापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:27 IST2020-03-20T12:23:54+5:302020-03-20T12:27:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील उभादगड व धांद्रे खुर्द या दोन गावांना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अद्यापही महसुली गावाचा दर्जा नसून ...

महसुली दर्जाअभावी विकासापासून वंचित
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील उभादगड व धांद्रे खुर्द या दोन गावांना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अद्यापही महसुली गावाचा दर्जा नसून ग्रामपंचायतही नसल्याने ग्रामस्थ व गाव विकासापासून वंचित आहे. जिल्हा प्रशासनाने या गावाकडे लक्ष देऊन त्वरित महसुली दर्जा देऊन व ग्रामपंचायत अस्तित्वात आणण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
जयनगर गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या उभादगड व धांद्र खुर्द हे दोन गावे आहेत. या गावांची लोकसंख्या अनुक्रमे १५०० व १३०० आहे. नवीन जनगणना केल्यास ही लोकसंख्या वाढणार आहे. हातमजुरीचे काम करून येथील कुटुंब आपला उदरनिर्वाह करतात. मात्र या गावांना महसुली दर्जा नसल्याने शासनाच्या वैयक्तिक योजनांपासून ग्रामस्थांना वंचित राहावे लागत असल्याने त्यांचा विकास खुंटला आहे. या गावांचा भूदान चळवळ व चारा सत्याग्रहात सक्रीय सहभाग राहिला असून अनेकांनी बलिदान दिले आहे. असे असताना या गावांना महसुली दर्जा नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायत निवडणूक
मतदानापासून वंचित
लोकशाहीत प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार आहे हे जरी सत्य असले तरी उभादगड व धांद्रे खुर्द या गावांना ग्रामपंचायत मतदानापासून वंचित राहावे लागते. पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभा या निवडणुकीतच मतदान करण्याच्या अधिकार येथील मतदारांना आहे. या गावांसाठी ग्रामपंचायत अस्तित्वात नसल्याने मतदार मतदानापासून व गावाच्या विकासापासून आजही कोसो लांब आहेत. याला जबाबदार कोण? असा प्रश्न या गावातील ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. अतिदुर्गम आदिवासी भागात असलेल्या या गावांकडे गेल्या अनेक वर्षापासून प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. ६५ वर्षानंतर उभादगड या गावाला प्रथमच राज्य परिवहन महामंडळाची बस पोहोचलेली आहे. ग्रामपंचायत व्यतिरिक्त इतर निवडणुकांसाठी मतदान करण्याचा अधिकार येथील मतदारांना आहे मात्र गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेली ग्रामपंचायतच अस्तित्वात नसल्याने त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान करणे किंवा सदस्य निवडीचा कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे गावाच्या विकासासाठी दोन्ही गावांसाठी ग्रुपग्रामपंचायत अस्तित्वात आणण्याची गरज आहे.
उभादगड व धांद्रे खुर्द या दोन्ही गावांचा विकास व तेथील ग्रामस्थांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. दोन्ही गावांना महसुली दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आणून गावांचा व ग्रामस्थांचा विकास करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उभादगड व धांद्रे खुर्द या गावांना महसुली दर्जा नाही. तसेच ग्रामपंचायत नाही किंवा जवळच्या गावातील ग्रामपंचायतीतही समावेश नाही. परिणामी गावात विकास योजना राबविता येत नाहीत. शासनाची कुठलीही योजना या गावांपर्यंत अद्याप पोहोचलेली नाही. गावासाठी स्वतंत्र शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी नसल्याने ग्रामस्थांना जयनगर येथील कर्मचाºयांकडून दाखले उपलब्ध करावे लागतात. १४ वा वित्त आयोग व पेसा अंतर्गत येणाºया निधीतून अनेक गावांमध्ये विकास कामे सुरू आहेत. मात्र या दोन्ही गावातील ग्रामस्थांना निधी तर सोडा पण या योजनांची व निधी कसा येतो याचीही माहिती नाही. शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचाही लाभ येथील ग्रामस्थांना घेता येत नाही.